शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सरकार महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना झटका देणार, जनतेवर पडणार टोल दरवाढीचा बोजा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 10:54 AM

1 / 8
केंद्र सरकारने देशभरात राष्ट्रीय महामार्ग तसेच एक्स्प्रेसवेचे जाळे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक राज्यांमध्ये ही कामे पूर्ण झाली असून त्यावरून वाहने सुसाट धावू लागली आहेत.
2 / 8
आता सरकार या मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांना झटका देणार आहे. महामार्ग तसेच द्रुतगती मार्गांवरील टाेलच्या रकमेत ५ ते १० टक्के वाढ हाेण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) तसा प्रस्ताव सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
3 / 8
राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांनुसार टाेलमध्ये दरवर्षी फेररचना केली जाते. सुधारित दर १ एप्रिलपासून लागू करण्यात येतात. त्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालय या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निर्णय घेणार आहे.
4 / 8
दरवाढीच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिल्यास, नवीन टोल दर १ एप्रिल २०२३ पासून लागू होतील. नुकत्याच सुरू झालेल्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्यात सध्या २.१९ रुपये प्रतिकिलाेमीटर असा टाेलचा दर आहे. दरराेज सरासरी २० हजार वाहने त्यावरुन धावतात. त्यावरील टाेलमध्येही वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
5 / 8
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारसारख्या हलक्या वाहनांसाठी ५ टक्के तर ट्रक आणि बस यांसारख्या अवजड वाहनांसाठी १० टक्के टोल दरात वाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे.
6 / 8
केंद्र सरकारने नवे आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी १० लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची तरतूद केली आहे. अलीकडेच सरकारने दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा सुरू केला.
7 / 8
हा एक्स्प्रेस वे जगातील सर्वात लांब एक्स्प्रेस वेपैकी एक आहे. यामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यानचा प्रवास २४ तासांवरून १२ तासांवर येईल. याशिवाय सरकार देशात सातत्याने रस्त्यांचे जाळे वाढवत आहे.
8 / 8
टाेल नाक्याच्या २० किलाेमीटर परिक्षेत्रात राहणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पासच्या रकमेतही २० टक्के वाढ हाेण्याची शक्यता आहे. या परिसरात राहणाऱ्यांना सध्या दरमहा ३१५ रुपयांचा अनलिमिटेड मासिक पास देण्यात येताे.
टॅग्स :tollplazaटोलनाकाGovernmentसरकार