By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 13:45 IST
1 / 5त्रिपुरी वात म्हणजे ७५० वातींचा समूह; आजच्या दिवशी त्रिपुरी वात जाळली जाते. मनुष्य मन षड्विकारांनी ग्रासलेले असते, त्रिपुर वात जाळल्यामुळे त्या विकारांचे दमन व्हावे अशी प्रार्थना केली जाते. षडरिपू आवश्यक आहेत, पण ते मर्यादित स्वरूपात ठेवायला हवेत ही जाणीव त्रिपुरी वात जाळताना मनाला दिली जाते. 2 / 5महादेवासमोर त्रिपुर वात जाळण्यामागे आणखी एक कारण म्हणजे, ज्याप्रमाणे महादेवांनी त्रिपुरासुराचा वध करून देवांच्या आयुष्यातील अंधःकार दूर केला त्याप्रमाणे आपल्याही आयुष्यातील अडी-अडचणी दूर करून महादेवांनी आपले आयुष्य प्रकाशमान करावे अशी प्रार्थना केली जाते. 3 / 5त्रिपुरी पौर्णिमेला महादेवाच्या उपासनेचा दिवस समजला जातो. या दिवशी शिवपिंडीवर दूध-पाण्याचा अभिषेक केला जातो. दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. बेल व पांढरे फुल वाहिले जाते. शिवस्तोत्र म्हटले जाते. त्रिपुरी वात पूर्ण जळली की त्याचे भस्म शिवलिंगाला आणि घरातल्या सर्वांना अंगारा म्हणून लावले जाते. या दिवशी दानालाही अधिक महत्त्व असते. 4 / 5आजच्या दिवशी घर, अंगण, परिसर, मंदिर दिव्यांच्या रोषणाईने उजळून टाकतात, देव दिवाळी साजरी करतात. दीपमाळ प्रकाशित केल्या जातात, तसेच दीप दानही केले जाते. आपल्या मुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातला अंधार दूर व्हावा ही त्यामागील सद्भावना असते. दीप दानाबरोबर गरजू व्यक्तीला आवश्यक वस्तू देखील दान करता येतात. त्यामुळेही अडचणींचा अंधार दूर होण्यास मदत होऊ शकते. 5 / 5पूर्वी ही वात घरातल्या स्त्रिया बनवत असत. कापूस पिंजून बारीक दोर ओढत अडीच वेढ्याची एक वात करत ७५० वातींचा समूह केला जात असे.आता ही वात बाजारात सहज विकत मिळते.