परभणी : शहरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी शहर बससेवा सुरू करावी, अशी मागणी येथील जागरुक नागरिक आघाडीने आ.डॉ.राहुल पाटील यांच्याकडे केली. त्यावर ४ सीएनजी ३२ सीटर बस आमदार निधीतून दिली जाईल, असे आश्वासन आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिले आहे.
जागरुक नागरिक आघाडीच्या १०० सदस्यांनी २३ ऑगस्ट रोजी आ.डॉ.राहुल पाटील यांची भेट घेऊन शहर बससेवा सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. त्यानंतर आ.डॉ. पाटील यांनी महानगरपालिकेचे उपायुक्त रणजीत पाटील यांना बोलावून घेतले. तसेच यासंदर्भात प्रस्ताव करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर यांनी प्रास्ताविक केले. आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून शहराच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबविण्यात येत असून लवकरच परभणीकरांच्या सेवेत सिटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शहरातील खासगी ऑटोरिक्षा चालकांकडून मुख्य रस्त्यांवर ये-जा करण्यासाठी १५ ते २० रुपये घेतले जात असले तरी वसाहतींच्या अंतर्गत रस्त्यांवर प्रवाशांना सोडण्यास अतिरिक्त २५ रुपये घेतले जात असल्याने सर्वसामान्यांची लूट होत आहे. त्यामुळे सर्वांना परवडेल अशी सार्वजनिक बससेवा शहरात सुरु करावी तसेच गावठाण हद्दवाढीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी ॲड.माधुरी क्षीरसागर यांनी यावेळी केली.
बैठकीस सोपानराव अवचार, प्रशांत ठाकूर, जागरुक नागरिक आघाडीच्या निमंत्रक ॲड.माधुरी क्षीरसागर, सुभाष बाकळे, संतोष आसेगावकर, ॲड.लक्ष्मण काळे, गजानन चौधरी, कर्हाळे, प्रा.सावित्री चिताडे, नीलिमा वाघमारे, विजया कातकडे, सुप्रिया कुलकर्णी, सुहासिनी कावळे, मंगल खामगावकर आदींची उपस्थिती होती.