सेलू तालुक्यातील वालुर, बोरगाव, शेलवाडी, वलंगवाडी यांसह आठ ते दहा गावातील ग्रामस्थांना सेलू, परभणी शहर गाठण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने दहा किमीचा रस्ता तयार करण्यात आला होता; मात्र हा रस्ता तयार करण्यात आल्यानंतर सहा महिन्यातच उखडला. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी लावून धरत हा रस्ता दुरुस्त करून घेतला; मात्र दुरुस्तीनंतरही काही दिवसातच या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामस्थांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेला १० किमी रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे निकृष्ट दर्जाचा झाला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन हा रस्ता नव्याने तयार करून घ्यावा, अशी मागणी वालूर, ईरळद, बोरगाव, शेलवाडी यांसह दहा गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे घेतली धाव
सेलू तालुक्यातील वालुर ते ईरळद या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी वालूर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता यांच्याकडे धाव घेतली आहे. या रस्त्याची चौकशी करावी,अशी मागणी केली आहे. निवेदनावर विलास सोनवणे, प्रभाकर जवकर, शिवाजी जीवने, रंगनाथ सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.