परभणी : पर्यावरण संतुलन व जैवविविधता टिकविण्यासाठी मधमाश्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. तेव्हा मधमाश्यांचा अधिवास वाढविण्यासाठी किमान २० टक्के क्षेत्रावर वृक्षलागवड करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभाग व औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने २० मे रोजी जागतिक मधमाशी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास पुणे येथील अटारी संस्थेचे संचालक लाखन सिंग, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, विभागप्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव, सूर्यकांत पवार, डॉ. डी. एम. वाखळे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. किशोर झाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले, मधमाश्या सतत कार्यमग्न राहतात. तसेच समूहाने राहतात. हा गुण मनुष्यासाठी शिकण्यासारखा आहे. मधमाश्यांचा नैसर्गिक अधिवास वाढविणे गरजेचे असून, विद्यापीठ शास्त्रज्ञांनी मधुमक्षिकापालनाबाबत जागृती करणे आवश्यक असल्याचे डॉ. ढवण म्हणाले. डॉ. लाखन सिंग, डॉ. धर्मराज गोखले, डॉ. देवराव देवसरकर, डी. एम. वाखळे, पुरुषोत्तम नेहरकर आदींनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. संजीव बंटेवाड यांनी प्रास्ताविक केले. किशोर झाडे यांनी सूत्रसंचालन केले. बसवराज भेदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. पी. आर. झंवर, डॉ. एस. एस. गोसलवाड, डॉ. डी. आर. कदम, डॉ. एम. एम. सोनकांबळे, डॉ. ए. जी. लाड, डॉ. एफ. एस. खान, डॉ. धरगुडे, डॉ. ए. एस. खंदारे आदींनी प्रयत्न केले.