परभणी विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत ४४४ बस दिवसभरात १२३५ बसफेऱ्या पूर्ण करीत आहेत. यातून एसटी महामंडळ प्रशासनाला २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असले तरी दुसरीकडे मात्र अपेक्षित प्रवाशांचा प्रतिसाद बससेवेला मिळत नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे पुणे, औरंगाबाद, मुंबई गाठण्यासाठी प्रवासी ट्रॅव्हल्सला पसंती देत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास सुरक्षित असतानाही ट्रॅव्हल्सला प्रवाशांची पसंती, असा प्रश्न पडला आहे.
एसटीला स्पीडलॉक, ट्रॅव्हल्स सुसाट
परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांतील रस्त्यावरून धावणाऱ्या ४४४ बसला एसटी महामंडळ प्रशासनाने स्पीडलॉक लावले आहे. त्यामुळे बहुतांश अपघात आतापर्यंत टळले आहेत. मात्र, दुसरीकडे कोणतेही स्पीडलॉक नसल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याने सुसाट धावताना दिसत आहेत. याकडे उपविभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने लक्ष देण्याची गरज आहे.