गंगाखेड: गोदावरी नदीपात्रात गंगाखेड ते धारखेडदरम्यान असलेला मातीचा कच्चा बंधारा ३० एप्रिल रोजी दुपारी १२.४५ वाजता जेसीबीच्या सहाय्याने फोडण्यात आला. मात्र, बंधारा फोडण्याबाबतची कल्पना महसूल व नगर परिषद प्रशासनाला नव्हती. याबाबत अधिकाऱ्यांशी केलेल्या संपर्कानंतर दोन्ही विभागातील अधिकारी अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
गंगाखेड ते धारखेडदरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या कामाजवळ पुलाच्या कंत्राटदाराने मातीचा भराव टाकून धारखेड गावाला जोडणारा रस्ता तयार केला. नदी पात्रात रस्ता व कच्चा बंधारा तयार झाला. या बंधाऱ्यात अडलेले पाणी शहराला पुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरत असतानाच शहराजवळील गोदावरी नदी काठावरील झोला, पिंप्री व मसला या गावात पाणी टंचाई जाणवत आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे ऊस वाळत असल्याने येथे साठा झालेले पाणी खालील गावांना सोडावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना सादर करून यापूर्वी नदी पात्रातील बंधारा फोडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, येथे असलेल्या पाण्यावर शहर वासीयांची तहान भागत असल्याने विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी बंधारा बचाव कृती समितीच्या माध्यमातून बंधारा फोडण्यास विरोध करीत हे पाणी शहरासाठी आरक्षित करावे अशी मागणी केल्याने पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी बंधारा फोडण्यासाठी आलेल्यांना बंधारा फोडू न देता येथे पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
२४ एप्रिल रोजी आमदार रत्नाकर गुट्टे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, प्रभारी मुख्याधिकारी स्वरूप कंकाळ, उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, पाणी पुरवठा अभियंता मयुरी पाटील व बंधारा बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांत बंधाऱ्यावर झालेल्या चर्चेनंतर गंगाखेड शहरासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा साठा कायम ठेवत बंधाऱ्याच्या मध्यभागी दोन पाईप टाकून खालील गावांना पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर अधिकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता ३० एप्रिल रोजी दुपारी १२.४५ वाजता मातीचा कच्चा बंधारा जेसीबीच्या साहाय्याने फोडण्यात आला. बंधारा फोडल्याची माहिती समजताच शहरातील व धारखेड येथील नागरिकांनी बंधाऱ्यावर एकच गर्दी करत बंधारा फोडणाऱ्याविरुद्ध संताप व्यक्त केला.
अधिकारी मात्र अनभिज्ञमातीचा कच्चा बंधारा फोडण्याची आपल्याला कोणतीच पूर्व कल्पना नसल्याचे तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी स्वरूप कंकाळ, पाणी पुरवठा अभियंता मयूरी पाटील यांनी सांगितले. बंधारा फोडण्याबाबत संबंधित विभागाचे अधिकारीच अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांना कुठलीही माहिती नसताना त्यांच्या परस्पर नदी पात्रातील मातीचा कच्चा बंधारा कोणी व कसा फोडला याबाबत शहरवासीयांतून सवाल उपस्थित केला जात आहे.