शहरात वादळी वाऱ्याचा फटका शुक्रवारी अनेक भागांना बसला. यात संभाजीनगर, शिवरामनगर येथील झाडे रस्त्यावर आडवी पडली. यानंतर शहर रात्री उशिरापर्यंत अंधारात होते. झाडे पडल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. ज्यात जायकवाडी वसाहत परिसरात तीन झाडे, रविराज पार्क, सुयोग कॉलनी, ममता कॉलनी, जायकवाडीतील शनिमंदिर परिसर, हडको, वसमत रोड परिसरातील रामकृष्णनगर, अमिन काॅलनी, पोलीस वसाहत, दर्गा रोड, जिंतूर रोडवरील काही वसाहतीत झाडे पडल्याचे प्रकार घडले आहेत. प्रत्यक्षात दोन मोठी झाडे रस्त्यावरून हटवून त्याचा अडथळा दूर करण्यात आला.
अधिकाऱ्याच्या घराच्या संरक्षक भिंतीवरील कठडे पडले
शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घराच्या संरक्षक भिंतीवर तारांचे कुंपण करून त्यावर कठडे बसविण्यात आले होते. शुक्रवारच्या वादळी वाऱ्यासह पावसाने १० ते १२ कठडे तारेसगट जमिनीवर पडले, तर त्यासोबत एक झाडही आडवे पडल्याचे दिसून आले.
नालेसफाई सुरू
मनपाने पावसाळ्यापूर्वीच्या पहिल्याच पावसात शहरात उडालेली धांदल पाहता शनिवारी तीन जेसीबीद्वारे नालेसफाई सुरू केली आहे. यात बसस्थानक, अमिन काॅलनी, पोलीस वसाहत परिसर आणि हडको येथे मोठ्या नाल्यांची सफाई सुरू केली आहे. ३ जेसीबी, १ पोकलँड, ५ टिप्परचा वापर केला जात आहे.
पावसाळ्यापूर्वी कामे करण्याचा विसर
महावितरण तसेच महापालिका आपत्कालीन विभाग आणि उद्यान, स्वच्छता या प्रत्येक विभागाने त्यांना नेमून दिलेले काम पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजना तसेच वीज तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, जुनी झाडे कापणे ही कामे करणे गजरेचे होते.