संचारबंदीमुळे प्रवाशांचे अतोनात हाल
जिंतूर : संचारबंदीमुळे तालुक्यातील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. एसटी सेवा आणि खाजगी वाहनेही बंद असल्याने या प्रवाशांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी कसरत करावी लागल्याचे दिसून आले.
रस्त्याच्या डांबरीकरणास प्रारंभ
जिंतूर : जिंतूर-येलदरी मार्गावर डांबरीकरणास प्रारंभ झाला आहे. पाच वर्षांपासून हे काम रखडले होते. त्याचप्रमाणे बसस्थानक ते साखरतळा या मार्गावरही एका बाजुने डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. पाच वर्षांपासून बंद असलेले काम मार्चएंडमुळे सुरू झाले की काय अशी नागरिकांत चर्चा आहे.
धूर फवारणी करण्याची मागणी
सोनपेठ : शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. सध्या कोरेानाचा संसर्ग वाढत असून, डासांमुळे ताप व इतर संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा नगरपालिका प्रशासनाने डास निर्मूलन करण्यासाठी शहरात धूर फवारणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
उघडे रोहित्र बनले धोकादायक
सोनपेठ : तालुक्यात अनेक ठिकाणी रोहित्रांना दरवाजे बसविलेले नाहीत. या उघड्या डिपींमधूनच वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे रोहित्राला धक्का लागून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. महावितरणने रोहित्रांना दरवाजे बसवावेत, अशी मागणी होत आहे.