परळी (जि. बीड) येथील अजय अशोक भोसले या युवकाचे १८ फेब्रुवारी रोजी पूर्णा रेल्वेस्थानक परिसरातून अपहरण झाल्याची तक्रार नातेवाइकांनी परळी पोलिसांत नोंदवली. ही घटना पूर्णा येथे घडली असल्याने हा गुन्हा ५ मार्च २०१९ रोजी पूर्णा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पूर्णा पोलीस या गुन्ह्याचा अपहरणाच्या दृष्टीने तपास करीत असताना त्यांना शंका आली. तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास पोउपनि. चंद्रकांत पवार यांच्याकडे हे प्रकरण तपासकामी सोपवण्यात आले. पथकातील जमादार मिर्झा बेग, जमादार किशोर कवठेकर, मंगेश जुक्ते, लतीफ पठाण, मिलिंद कांबळे, समीर पठाण, विष्णू भिसे यांनी परळी परिसरात तपास चक्रे फिरवली. हे अपहरण नसून काही तरी वेगळा प्रकार असल्याची त्यांना शंका या पथकाला आली. अपहरणकर्ते हे परळी येथून वाहन करून आले असावे, असा अंदाज लावत. त्यांनी वाहन चालकांशी विचारपूस केली. वाहनधारकाकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांना तपासाची दिशा सापडली. परळी रेल्वेस्थानक भागातून त्यांनी १८ मार्च रोजी शक्तीसिंग बावरी व बच्चन सिंग बावरी या दोघांना ताब्यात घेऊन पूर्णा येथे आणले. त्यांची चौकशी व विचारपूस केल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली. परळी येथील त्या युवकाचे नुसते अपहरण नसून चक्क खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. आपल्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात फासून पळून नेले होते. याचा राग मनात धरत त्या प्रियकराचा आपण खून करून त्याचा मृतदेह परळी येथे थर्मल परिसरात झुडपात पुरला असल्याचा जबाब त्यांनी दिला. आरोपीने खुनाची कबुली दिल्यानंतर परत पोउपनि चंद्रकांत पवार व त्यांचे पथक आरोपींना घेऊन घटनास्थळी हजर झाले. स्थानिक अधिकारी व पंचांच्या समक्ष तो पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर मुलाचा खून झाला, हे निष्पन्न झाले; परंतु मुलगी कुठे याचा शोध नव्हता. परत आरोपींशी चौकशी केल्यानंतर ती मुलगी व तिच्या आईला तेलंगणामधील बिचकुंडा येथून ताब्यात घेतले. त्यांना पूर्णा येथे आणल्यानंतर या गुन्ह्याचे एक एक धागे उकळू लागले. मुलीची आई, भाऊ, नातेवाईक यांच्या सर्वांच्या चौकशीत पुढे आले की, मयत अजय व त्या मुलीचे प्रेमप्रकरण घरच्यांना आवडले नाही. मुलीला धोक्यात ठेवून तीस व तिच्या प्रियकराला पूर्णा येथे बोलवले. त्यानंतर त्याचे अपहरण करून त्याचा खून झाला, ही बाब स्पष्ट झाली.
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी शक्तीसिंग बावरी, बच्चन सिंग बावरी, चरणसिंग, घमंडसिंग व खज्जूबाई यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. मुलगी अल्पवयीन असल्याने तिची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. पुढे या मुलीस नातेवाइकाच्या स्वाधीन केल्यानंतर तिनेही तेलंगाणा बिचकुंडा भागात राहत्या घरी आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेतील चार आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत आहेत. तसेच परळी येथील माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांचा तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपींना सहकार्य करीत असल्याच्या संशयावरून मयत अजय भोसले यांच्या नातेवाइकांशी वाद झाला. या वादात गायकवाड यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी परळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.