गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांचे बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, जिल्ह्यांमध्ये २५ ते ३५ एकर क्षेत्रावर पेरणी केलेले बियाणे उगवले नाही. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करून दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांवर ही वेळ येऊ नये, यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या वतीने उन्हाळी हंगामात सोयाबीनची पेरणी करण्यासाठी ग्रामीण भागात कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर शिवाजी मेहत्रे यांच्या मदतीने जिल्हा कृषी अधीक्षक डॉक्टर संतोष आळसे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. परिणामी जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक ७५० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. सद्यस्थितीत हे पीक काढणीला आले असून, यातून जवळपास सात हजार ५०० क्विंटल सोयाबीनचे बियाणे बळीराजाकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांवर आता कंपन्यांचे बियाणे विकत घेण्याची वेळ येणार नाही.
ज्या शेतकऱ्यांकडे सध्याच्या स्थितीत हंगामातील पिकांमधून सोयाबीन बियाणे उपलब्ध झाले आहेत. त्या शेतकऱ्यांनी गोणपाटात शंभर बिया टोकून त्याची उगवण क्षमता तपासावी. शंभर पैकी ७० बिया उगवल्या तर ते सोयाबीन बियाणे पेरणीयोग्य असल्याचे समजावे.
डॉ. संतोष काळे, जिल्हा कृषी अधीक्षक, परभणी