मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोना झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या दररोज दुपटीने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाला बुधवारी २ हजार ६८३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ४९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या २ हजार ७२ अहवालांमध्ये ३४८ आणि रॅपिड टेस्टच्या ६११ अहवालांमध्ये १५० रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यात मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. मागच्या एक आठवड्यापासून दररोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. बुधवारी शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ३ पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात १४ हजार ४५७ एकूण बाधित रुग्णसंख्या झाली असून, त्यापैकी ११ हजार ६७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ४१२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. सध्या २ हजार ३६७ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खाजगी रुग्णालये फुल्ल झाली असून, या रुग्णालयात २९९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल १ हजार ८८८ एवढी आहे.