मागील खरीप हंगामात अवकाळी पाऊस व रब्बी हंगामात वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या हाती दोन्ही हंगामांतील पिकांमधून उत्पन्न हाती लागले नाही. त्याचबरोबर मागील वर्षीपासून कोरोना संसर्गामुळे शेती संलग्न असणारे व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे शेतकरी सद्य:स्थितीत आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यातच खरीप हंगामाची पेरणी तोंडावर येऊन ठेपली आहे. या खरीप हंगामातील पेरणीसाठी आवश्यक असणारे बी-बियाणे, खते व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागात उसनवारी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पीक कर्जाकडे लागल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या वर्षीच्या खरीप हंगामासाठी १२१३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. मात्र बॅंकांकडून कर्ज वाटप करताना आखडता हात घेतला जात असल्याने बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
पीककर्ज वाटप करताना बँकांकडून आखडता हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST