शहरात मागील काही दिवसांपासून आरटीपीसाआर चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. यामुळे रुग्ण संख्या कमी प्रमाणात आढळून येत आहे. महापालिका आरोग्य विभाग व पोलिसांचे पथक शहरातील जिंतूर रोडवरील जाम नाका, गांधी पार्क भागातील उद्यान व वसमत रोडवरील काळी कमान येथे सकाळी १० ते दुपारी तीनच्या दरम्यान कार्यरत होते. यादरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची आरटीपीसाआर चाचणी केली जात आहे. दुचाकीसह ऑटोमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसाआर चाचणी करण्यासाठी अडविले जात आहे.
गांधी पार्क पथकाला तीनशे किट प्राप्त
शहरातील गांधी पार्क येथे कार्यरत पथकाला ३०० किट तर जिंतूर रोडवरील जाम नाका येथे ५०० किट प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार दुपारी दोन वाजेपर्यंत गांधी पार्क येथे १७० नागरिकांची तर जाम नाका येथे तीनशे जणांची आरटीपीसाआर चाचणी करण्यात आली.
वाहने अडविल्याने प्रवासी गायब
शहरातील गांधी पार्क भागात शिवाजी चौक तसेच स्टेशन रस्त्यावरून येणाऱ्या ऑटोला सुद्धा अडविले जात होते. यावेळी ऑटो चालकासह प्रवाशांची चाचणी करण्यासाठी पथकाने थांबविले असता ऑटोतील महिला प्रवासी जागेवरून पायीच निघून गेल्या. मात्र, ऑटोचालकाला स्वतःची टेस्ट करावी लागली. असाच प्रकार जिंतूर रोडवरील जाम नाका येथील घडला. काही ठिकाणी वाहनधारकांना दंड लावण्यात आला. या कारवाईमुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली होती.
आरसीपी प्लाटून कार्यरत
शिवाजी चौक, गांधी पार्क व जिंतूर रोड येथील जाम नाका भागात नानलपेठ, कोतवाली पोलिसांसह आरसीपी प्लाटूनचे जवान कार्यरत होते. यामुळे परिसरात वीस ते पंचवीस पोलीस कर्मचारी व महापालिकेचे दहा ते पंधरा कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून आले. तसेच अनेकांनी एच्छिकही चाचणी केल्या. यासह रेल्वेस्थानक येथेही काही रेल्वेतील प्रवाशांची चाचणी केली. दिवसभरात झालेल्या चाचण्यांचे अहवाल दूसऱ्या दिवशी येणार आहेत.