परभणी : नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने नळजोडण्या घ्याव्यात या उद्देशाने मनपाने पाणी करासाठी १०० टक्के आणि मालमत्ता करासाठी ५० टक्के शास्ती (विलंब आकार) शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन कर भरावा, असे आवाहन मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी केले आहे.
शहरात नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेवर नळजोडणी घेण्यासाठी नागरिकांना पाणी आणि मालमत्ता कर भरणे अनिवार्य आहे; मात्र दोन्ही कर एकाच वेळी भरणे अनेक नागरिकांना शक्य नाही. त्यामुळे नळजोडणी घेण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याची बाब दिसून आली. या योजनेवर नळजोडण्याची गती वाढावी, या उद्देशाने शास्ती माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ३१ मार्चपर्यंत ही सवलत लागू केली होती. यापुढेही एकरकमी कर भरणाऱ्या नागरिकांना नळपट्टीत १०० टक्के आणि मालमत्ता करात ५० टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सूट १० ते २८ फेब्रुवारी या कालावधीतील ३१ मार्चपर्यंतचा मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा केल्यास लागू राहणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त देवीदास पवार यांनी केले आहे.