उच्चशिक्षित, आयटीत काम करणारी आधुनिक मुलंही का उतरली जलीकट्टूच्या समर्थनासाठी?
आमच्या परंपरेनं, संस्कृतीनं, लोकजीवनानं इतकी वर्षं जे जपलंते एका निर्णयात निकाली कसं काढता?आमची स्थानिक संस्कृती, खाद्यपदार्थ, आमचं आचरण, पेहरावही आमची ओळख आहेआणि ती आम्हाला जपायची आहे. आधुनिक होणं म्हणजे हे सारं पुसून टाकणं असेलतर ते आम्हाला मान्य नाही!चेन्नईमध्ये आयटी कंपनीत मी काम करतो. मी, माझे मित्र, आमचं सर्कल, आमची लाइफस्टाइल हे वेगळं असतं. भात, कपडे आणि वायफाय या आमच्या तीन जीवनावश्यक गरजा. आम्ही शहरीच आयुष्य जगतो. पण यावर्षी आमच्या शहरी जगण्यातली पुटं उडाली आणि आम्ही एकदम बदलून गेलो.
जलीकट्टू हे निमित्त.. वी कॅन डू समथिंग, वी हॅव दॅट पॉवर विथ अस. हे एकदम आम्हाला जाणवलं. आणि लाइफ कालच्यासारखं आज उरलं नाही.
पोंगल हा आमचा तामिळनाडूमधला मोठा सण. तीन दिवस या सणाची मोठी धामधूम असते. पारंपरिक पद्धतीने तामिळनाडूच्या विविध भागांमध्येही वेगवेगळ्या पद्धतीनं हा सण साजरा होतो. त्यात जलीकट्टूचा एक दिवस. दक्षिण तामिळनाडू आणि विशेषत: मदुराईच्या आसपास जलीकुट्टू साजरा केला जातो.
दोन हजार वर्षांहून अधिक काळ आम्ही हा सण साजरा करतोय. आमच्या तमिळ जगण्याचा तो एक भाग आहे. आमच्या संस्कृतीचा घटक आहे. बाहेरून कुणी एक प्राणिप्रेमी संघटना येते आणि आमच्या सणावर बंदी घातली जाते. का? आमच्याही शेतकऱ्यांचं बैलांवर, प्राण्यांवर प्रेम आहे. त्यांची काळजी कशी घ्यायची हे आम्हालाही कळतं. म्हणजे जी गोष्ट आमच्या परंपरेनं, संस्कृतीनं, लोकजीवनानं इतकी वर्षं जपली ती एका निर्णयात निकाली कशी काढता?
हा आमच्या सांस्कृतिक ओळखीवरच निर्माण झालेला सवाल आहे. आमच्या तमिळ अस्मितेचा मुद्दा आहे. आम्हाला आमची ‘ओळख’ म्हणून काही गोष्टी जपाव्याशा वाटल्या तर त्यात चूक काय?आम्ही आयटी कंपन्यांमध्ये काम करतो हे खरंय, आमचा संबंध काय बैलांशी नी शेतीशी हेही खरं आहे. पण आमचा संबंध आमची स्थानिक संस्कृती, खाद्यपदार्थ, आमचं आचरण, आमचा पेहराव यांच्याशी तर आहे. तीच आमची ओळख आम्हाला जपायची आहे. आधुनिक होणं म्हणजे हे सारं पुसून टाकणं नाही. आमचं ‘लोकल’ जे आहे, ते आम्ही जपणार. कुणाला तरी वाटतं म्हणून ते आम्ही सोडून द्यायचं हे कसं चालेल?
नवं स्वीकारायला हवं ते स्वीकारतोच आम्ही, पण म्हणून आमचं जुनं पार मोडीत काढायला निघाले तर आम्ही ‘शहरी’ झालो म्हणून गप्प कसे बसणार होतो? म्हणूनच पहिल्यांदा आयुष्यात आम्ही घराबाहेर आणि आमच्या एसी आॅफिसच्याही बाहेर पडलो.
गेलो ते तडक चेन्नईच्या मरिना बीचवर. मरिना हा चेन्नईचा रम्य समुद्रकिनारा. भारतातील सर्वात मोठा बीच. जलीकट्टूला समर्थन देण्यासाठी तिथं लाखो तरुण जमले. त्यात कोण शेतकरी, कोण आयटीवाला हा फरक उरला नाही. आम्ही शांतपणे आलो, जमलो.
या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे तरुण गर्दीनं कोणतेही रस्ते बंद केले नाहीत की धावत्या चेन्नईत अडथळे येतील असं काही केलं नाही. बैलाची चित्रं असलेले किंवा या खेळावर बंदी घालणाऱ्यांचे कार्टून्स असलेले टी-शर्ट्स तरुणांनीच छापले, बॅनर्स तयार केले आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. काही लोकांनी सोशल मीडियावर आघाडी उघडली. जलीकट्टूबद्दल आजवर अत्यंत तोकडी माहिती इतर लोकांना होती, पण यावर्षीच्या आंदोलनाच्या बातम्यांमुळे भारतभरात लोकांना जलीकट्टूची माहिती झाली. सोशल मीडियामुळेही आम्ही आमची बाजू मांडली. व्हॉट्सअॅपचे ग्रुपही तयार झाले. टिष्ट्वटरवर तर सेव्ह जलीकट्टू, सेव्ह तमिल पीपल असे हॅशटॅग सुरू झाले. मरिना बीचवर संध्याकाळी अंधारामध्ये सगळ्यांनी फोनवर फ्लॅशलाइट लावले तेव्हा असंख्य दिव्यांचा एक मोठा कोलाज तयार झाला होता. विजेपलीकडचा होता हा उजेड. आमच्या एकतेचा.
या आंदोलनामध्ये आम्ही तमिळ तरुण नव्यानं एकमेकांना ओळखू लागलो. दिवसरात्र अनेकजण मरिनावरच काढू लागले. यात अजून एक गोष्ट. तरुण होते तशा या आंदोलनात तरुणीही होत्या. पण कुणाही तरुणीच्या बाबतीत काही वावगं वागल्याची एक घटना नाही. आम्ही तरुण गर्दीतही एवढे सभ्य वागू शकतो, हा आम्हाला स्वत:चाच लागलेला एक शोध होता. ‘तमिळ’ मुस्लीम तरुण आमच्यासाठी बिर्याणी घेऊन येत होेते. एक आजोबा सायकलवरून यायचे आणि आम्हाला बिस्किटं वाटायचे. जाती-धर्म-लिंग-वय यापलीकडची एकता मी या आंदोलनात अनुभवली, जी मी पूर्वी कधी जगलो नव्हतो.
आम्ही मेट्रो शहरांमध्ये राहत असलो तरी पारंपरिक पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या खेळाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. चेन्नईच्या प्रत्येक आयटी कम्पाउंडमधील किमान दोनशे तरी तरुण-तरुणी मरिनावर दिसली. इतकंच नव्हे तर बेंगळुरूमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणारी मुलंही या आंदोलनात उतरली.
मला असं वाटतं की आपला भारत देश हा संघराज्य जरूर आहे, त्यामुळे देश म्हणून त्याला एकजिनसत्व नक्कीच आहे, ते असलंही पाहिजे. पण म्हणून त्यातील विविधतेला नाकारता कामा नये. त्या विविधतेचा आदर झाला पाहिजे. आपल्या स्थानिक परंपरांशी तडजोड करणं, त्या नाकारल्या जाणं बरं नाही. म्हणूनच हे आंदोलन राजकीय नाही. कुणी राजकीय पक्षानं आम्हाला गृहीतही धरू नये. आम्ही ‘सोशली’ जागे झालो आहोत तर आमच्याकडून अधिक काही चांगले घडो अशी आता आमचीही इच्छा आहे. - भारथीराज कनगराज(भारथीराज मूळचा कोईम्बतूर जिल्ह्यातल्या पोल्लाची गावचा रहिवासी असून, चेन्नईमध्ये एका प्रतिष्ठित आयटी कंपनीमध्ये नोकरी करतो.)