पैसा नाही, तर शिक्षण नाही असं कोण म्हणतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 06:34 PM2019-08-01T18:34:14+5:302019-08-01T18:37:36+5:30

शिक्षणासाठी पैसे नाहीत, म्हणून मुलं/मुली आत्महत्या करतात ! काहींचं शिक्षण कायमचं थांबतं, काहींना ते अर्ध्यावर सोडून वाट्टेल ती कामं करावी लागतात. आणि त्यांना व्यवस्था उत्तर काय देतात, तर ‘सुविधा नहीं है!’ केंब्रिजचा प्रवेश सोडून पापड विकण्याची वेळ सुपर थर्टीवाल्या आनंदकुमारच्या वाट्याला ज्या देशात येते, त्याच देशातल्या तरुणांचं आजचं वास्तवही तेच सांगतंय. फी भरायला पैसे नाहीत, मग शिक्षण इल्ले ! यावर उपाय काय?

Who says no money, no education? | पैसा नाही, तर शिक्षण नाही असं कोण म्हणतं?

पैसा नाही, तर शिक्षण नाही असं कोण म्हणतं?

Next

-ऑक्सिजन टीम

मोहोळ - देगाव गावची रूपाली. ती पंजाबमध्ये बी.टेक करणार होती. प्रवेशही निश्चित केला मात्र पुढे पूर्ण फी भरायला पैसे नसल्यानं तिनं आत्महत्या केली.
खरं तर आपल्या लेकीनं खूप शिकावं असं वडिलांना वाटत होतं. त्यांनी जमीनही विकायला काढली. पण जमिनीला भाव येईना आणि तोवर रूपालीनं आस सोडली आणि कीटकनाशक पिऊन जगाचा निरोप घेतला.
**
रूपालीची बातमी यावर्षीची, अगदी चार दिवसांपूर्वीची ही घटना. मात्र मागच्या वर्षी अमरावतीच्या मिनलनेही अशीच आत्महत्या केली होती. ती बी.कॉम. द्वितीय वर्षात शिकत होती मात्र दुस-या वर्षाची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते शेवटी शिकता येत नाही म्हणून तिनं आत्महत्या केली.
**
कोल्हापूरचाच विवेक. निराधार. आजीकडे राहतो. त्यानं उत्तम मार्क मिळवलेत, त्याला बी.टेक करायचं आहे; मात्र फी भरायला पैसे नाही, त्याला मदतीचा हात द्या असं सांगणारी बातमी गेल्याच आठवड्यात लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली.
***
या अशा बातम्या प्रसिद्ध होतात तेव्हा हतबल वाटतं. काही जीव शिक्षण थांबतं म्हणून आत्महत्या करतात. मात्र जे करत नाही, ते घुसमटून जगतात. त्यांच्यासमोर फी भरण्याचे काहीच पर्याय नसतात. असतात ती फक्त डोळ्यात स्वप्न. आणि केवळ पैसा नाही म्हणून शिक्षण थांबतं. सुपर थर्टी हा सिनेमा पाहिलाच असेल तुम्ही तर त्यातलं ‘सुविधा नहीं है !’ हे तीन शब्द आपल्यालाही हतबल करतात. केंब्रिजला प्रवेश मिळालेला आनंदकुमार केवळ पैसा नाही, कुणीच मदत करत नाही म्हणून चक्क पापड विकू लागतो आणि खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकवतो ही त्या सिनेमाची गोष्ट आपल्या समाजाचं आज असलेलं वास्तवच सांगते.

सुदैव म्हणा की काही आनंदकुमारांना तरी पुढं मार्ग सापडतो. मुलांना तरी घरचे शिकवतात, मात्र मुलींचं काय? त्यांचं शिक्षण तर पैशाअभावी हमखास थांबतं. मुळात मुलींना कुणी फार शिकवावं या मताचं आजही खेड्यापाड्यात नसतंच, अपवाद थोडे. तिच्या लग्नासाठीच पैसा उभा कसा करायचा याचा ताण पालकांना असतो. लग्न हाच प्राधान्यक्रम. त्यामुळे तिच्या कॉलेजची फी भरावी यासाठी कर्ज कोण काढणार? जोवर लग्न होत नाही तोवर शिक असाच एकूण मामला.

‘ऑक्सिजन’ला रोज जी पत्रं येतात, त्यात आपली करुण कहाणी सांगणारे मुलींचे अनेक स्वानुभव असतात. कुणाचं शिक्षण सुटलं, कुणाचं बळजबरी लग्न होतं, लग्नानंतर शिक म्हणतात; पण सासरचे शिकू देत नाहीत. काहींना उच्चशिक्षण घ्यायचं असतं; पण पालक शहरात पाठवत नाही, काहींना तालुक्याच्या गावीही जायची परवानगी नसते.

आणि ज्यांच्या घरचे तयार असतात त्यांच्याकडे अनेकदा पैसा नसतो. यंदा दुष्काळानं सगळ्यात मोठी कु-हाड मुलींच्या शिक्षणावर आली असं एकूण चित्र आहे. दुर्दैवानं त्याची आकडेवारी उपलब्ध नाही.
त्यामुळे आर्थिक मदत, तीही वेळेवर, कर्ज स्वरूप, स्कॉलरशिप म्हणून मिळणं किती गरजेचं आहे हे खेड्यापाड्यातील मुलं सांगू शकतील.
दुर्दैव हे की त्यासाठीचे अत्यंत कमी पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. आशा इतकीच की पूर्वी पर्यायच नव्हते, आता किमान पर्याय उपलब्ध आहेत आणि एज्युकेशन लोन देणा-या  बॅँका तरी आहेत. 
मात्र त्यांच्यापर्यंत मुलं आणि पालक पोहचतात का?
त्याचं उत्तरही नकारार्थीच आहे.

मुलं आणि पालकांचं काय चुकतं?

पैशासमोर सारेच हतबल असतात आणि पैशाची सोंग आणता येत नाहीत हे खरंच आहे. मात्र तरीही पर्याय शोधायला हवेत, त्यासाठीची खटपट करण्यात मुलं कमी पडतात. आणि पालकांना ते पर्याय आहेत हेच अनेकदा माहिती नसतं.
1) मुळात आपण अमुक एक अभ्यासक्रम का करतो आहोत हेच मुलांना माहिती नसतं, केवळ पिअर प्रेशर म्हणून अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला जातो. त्यासाठीच्या फीचा विचार केला जात नाही. त्याऐवजी पर्याय शोधले तर ते सापडतात, मात्र मीच का तडजोड करायची, मीच का मित्रांना सोडायचं, मीच का साधं कॉलेज घ्यायचं याचं भांडवल करूनही अनेक मुलं महागडी कॉलेजं निवडतात.
2) लाइफस्टाइलचा खर्च, कॅन्टीन, बाइक, कपडे यासाठीही पालकांकडून पैसे उकळले जातात. आणि एकूण शिक्षणाचा खर्च वाढतो.
3) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन लोनचा पर्याय तपासला जात नाही. किंवा काहीजण तो गांभीर्यानं घेत नाही. कागदपत्र पूर्तता करत नाहीत. मात्र ती प्रक्रिया आता सोपी आहे, त्यासाठी किमान प्रय} करून मुलांनी आपल्या उच्चशिक्षणाची जबाबदारी तरी स्वत: घेतली पाहिजे. कर्ज फेडण्याची तयारी ठेवली पाहिजे.
4) पिअर प्रेशर ही मोठी गोष्ट असते, त्यामुळे कॉलेजात येऊनही वर्गात अनेकजण येत नाहीत. त्यांना अभ्यास कळत नाही, आणि इयर ड्रॉप, बंक आणि अन्य गोष्टी यातच वेळ जातो त्यानंही शैक्षणिक खर्च वाढतो.
5) लांब शहरं, मोठी शहरं यांचा आग्रह धरूच नये असं नाही मात्र त्यासाठीच्या खर्चाचे पर्याय नसतील तर शिक्षण थांबवण्याऐवजी जवळचे कॉलेज निवडणं उत्तम.

---------------------------------------------------------------------

करिअर पर्याय बहुतांश उपलब्ध असले, विविध कोर्सेस करणं शक्य असलं तरी त्यासाठी फी भरण्याचे पर्याय किंवा सुविधा आपल्याकडे गरीब किंवा गरजू मुलांसाठी फार उपलब्ध आहे असं दिसत नाही. त्यामुळे अनेकांच्या शिक्षणावर परिणाम होतो हे खरं आहे. त्यामुळेच कुणी धर्मदाय ट्रस्ट किंवा सरकार जर स्कॉलरशिप देत असेल तर त्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचायला हवी, जी आज तरी उपलब्ध नाही.
- अतुल कहाते

-----------------------------------------------------------------

करिअर काउन्सिलिंगला जी मुलं येतात, त्यांना आम्ही हे समजावतो की, स्वप्न पाहणं चूक नाही मात्र आर्थिक पर्यायांचा विचारही करायला हवा. अनेकदा मुलं टोकाचं पाऊल उचलतात तेव्हा त्या निर्णयापूर्वी त्यांच्या मनात काय चलबिचल चालू असते, त्यांचा कोलाहल असतो याचाही विचार करायला हवा. योग्य समुपदेशन, माहिती, करिअरची माहितीच नाही तर अन्य पर्यायांची माहितीही उपलब्ध व्हायला हवी. पालकांनी आणि मुलांनीही एक गोष्ट नाही तर सगळं संपलं अशा टोकाच्या निर्णयाप्रत जाऊ नये. 
- अनुराधा प्रभूदेसाई 
(मानसोपचारतज्ज्ञ आणि करिअर काउन्सिलर)
(प्रसिद्ध लेखक आणि संगणक तज्ज्ञ)

Oxygen@lokmat.com

Web Title: Who says no money, no education?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.