जगातल्या कुठल्याही देशात तुम्ही जा, गरीब किंवा श्रीमंत. एक गोष्ट तुम्हाला नक्कीच जाणवेल. तिथल्या एअरपोर्टवर तर आपल्याला प्रत्यक्ष पाहायलाच मिळेल. भारतात येण्यासाठी अनेकांचा ओढा असतो. कारणं अनेक असतील. कोणाला निव्वळ पर्यटनासाठी म्हणून भारतात यायचं आहे, कोणाला इथल्या अध्यात्मात रस आहे, कोणाला इथल्या पुरातन संस्कृतीत रस आहे, कुणाला भारतातल्या नव्या वातावरणात मोठय़ा प्रमाणात पैसा आणि बिझनेस दडलेला दिसतो आहे, कुणाला इथलं अँडव्हेन्चर खुणावतं आहे, कुणाला इकोटुरिझम भुरळ घालतं आहे, तर लहान-मोठय़ा आजारांनी हैराण झालेल्यांना स्वस्त आणि खात्रीशीर इलाजासाठी भारतात यायचं आहे. मेडिकल टुरिझमच्या वाढीचा वेग तर अक्षरश: थक्क करणारा आहे. उपचारांसाठी जगभरातून जवळजवळ पहिल्या क्रमांकांची पसंती भारताला आहे आणि तब्बल तीस टक्क्यांपेक्षाही अधिक राक्षसी वेगाने भारतातले मेडिकल टुरिझम फोफावते आहे.
या उद्योगातून भारताला मोठय़ा प्रमाणात परकीय गंगाजळी तर मिळते आहेच, पण या उद्योगानं खूप मोठय़ा प्रमाणात रोजगारही पुरवला आहे. त्यात सातत्याने वाढ होत आहे.
ही वाढ किती आहे?
आकड्यांत आणि तेही वर्ल्ड ट्रॅव्हल अँण्ड टुरिझम कौन्सिलच्या अभ्यासानुसार सांगायचं तर सात लाख कोटी रुपयांची उलाढाल सध्याच या उद्योगाच्या माध्यमातून होते आहे आणि त्यातून ४0 कोटी लोकांना रोजगार मिळतो आहे. वार्षिक आठ टक्के दराने या उद्योग-व्यवसायात वाढ होते आहे. ती कायम राहील आणि येत्या किमान दहा-पंधरा वर्षांत तरी वाढीचा वेग कमी होणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जगात सध्या अत्यंत वेगाने भारतात हा उद्योग वाढतो आहे आणि रोजगाराच्या अनंत संधीही त्यामुळे निर्माण झाल्या आहेत. फास्टेस्ट ग्रोइंग टुरिझम इंडस्ट्री म्हणून जगभरात आताच भारताला तिसरा क्रमांक मिळालेला आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेरून भारतात येणार्या पर्यटकांची संख्या मोठय़ा वेगाने वाढते आहे. सर्वच पर्यटकांची महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांना आणि त्यातही मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि आग्रा या शहरांना सर्वाधिक पसंती आहे. जगभरातले पर्यटक जणू भारताच्या प्रेमातच पडले आहेत.
दुधात साखर म्हणजे खुद्द भारत सरकारही या क्षेत्राच्या वाढीसाठी खूपच संवेदनशील आणि आग्रही आहे. त्यामुळे टुरिझमबरोबरच ‘हॉस्पिटॅलिटी’ (आतिथ्यशीलता) क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध होतं आहे. या वारूवर आत्ताच स्वार झालात तर जगावर राज्य कराल !.
फूड अँण्ड बेव्हरिज सर्व्हिस
पर्यटनाबरोबरच पर्यटक आजकाल खाद्य-पेयालाही तितकंच किंबहुना कांकणभर अधिकच महत्त्व देतात. खान-पान सेवा चांगली नसल्यामुळेच अनेक प्रवासी कंपन्यांनी गटांगळ्या खाल्ल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळेच या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे.
फ्रंट ऑफिस स्टाफ
पर्यटनाला तर प्रत्येकालाच जायचं असतं. पण सगळ्याच गोष्टींची त्यांना माहिती असेलच असं नाही. त्यामुळे प्रवासी कंपन्या, तशी सेवा देणार्यांच्या कार्यालयांत इच्छुक पर्यटकांचा राबता मोठय़ा प्रमाणात असतो. त्यांचं आगत-स्वागत आणि त्यांच्या शंकांचं समाधान करून योग्य सेवा पुरवणं हे अत्यंत महत्त्वाची बाब. त्यासाठी हुशार, चुणचुणीत तरुणाईला आपल्याकडे खेचण्यासाठी सारेच उतावीळ झालेत. आपल्याकडे हे कौशल्य असेल तर या जागा तुमच्यासाठीच.
टिकेटिंग अँण्ड सेल्स
प्रवाशांना पर्यटनाला घेऊन जायचं आणि त्यांना उत्तम सेवा द्यायची तर त्याची सुरुवात किमान महिना-दोन महिना आधीच होते. तिकिटं बुक करण्यापासून तर ऐनवेळी ती मिळविण्यापर्यंत आणि पर्यटकांना उत्तम सेवा देऊन त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. ही कसरत करू शकणार्यांसाठी संधीची दारं कालही सताड उघडी होती, आजही आहेत, उद्या तर त्यांच्यासाठी पायघड्या अंथरल्या जातील.
टूर गाईड्स
पर्यटनाला जाणं ही गोष्ट आता चैनीची राहिलेली नाही. रोजच्या धबडग्यातून उसंत मिळावी आणि फ्रेश होऊन पुन्हा कामाच्या राहाटगाडग्याला जुंपण्यासाठीही अनेक जण आता सहकुटुंब पर्यटनाला जातात. काही जण प्रवासी कंपन्यांबरोबर, काही जण स्वत:च तर काही जण आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाणं पसंत करतात. त्यांच्यासाठी ‘टेलरमेड टूर्स’ आयोजित करून देणं हा सध्या एक खूप मोठा व्यवसाय झालेला आहे. पुढच्या काळात त्यात आणखीच ‘बरकत’ आहे.