तो दिवस होता, मी असंच रूममध्ये बसून होतो. दोन-तीन आठवडे झाले होते, माझं आणि तिचं काही कारणांमुळे चांगलंच भांडण झालं होतं. दोन-तीन आठवड्यांपासून आम्ही बोललोही नव्हतो. अचानक एक दिवशी रात्री तिचा फोन आला, मी उचलला, फक्त तीच बोलली. ‘‘उद्या मला तुला भेटून सगळं क्लिअर करायचं आहे, उद्या ये आणि त्यानंतर तूही मोकळा अन् मीही.’’
दिवसभर मी शांत, बेडवरती तसाच पडून होतो. काय होत होतं ते मला काहीच कळत नव्हतं.
सायंकाळचे चार वाजले. मी झोपेतून उठून आवरण्यासाठी तयारी करत होतो. आवरलं, बाईक घेऊन तिला भेटण्यासाठी निघालो.
ठरलेल्या जागी पोहोचलो. ती आलेली नव्हती. तोपर्यंत त्या कॉफी शॉपमध्ये तसाच तिची वाट पहात बसलो. हा कॉफी शॉप आमच्या नेहमीचा भेटीचा स्पॉटच होता. ती आली काही न बोलताच बसली. बोलायचं तर खूप काही होतं पण तोंडच उघडत नव्हतं. मीच मग वेटरला कॉफीची ऑर्डर सांगितली आणि तिच्या हातावर हात ठेवला. पण तेवढय़ातच बाहेरून जोराची वीज कडाडली आणि तिनं माझा हात तिच्या हातात घट्ट पकडला. कॉफी पीत पीत आमच्या बोलण्याला सुरुवात झाली आणि बाहेर पाऊस वाढतच होता. खरंतर ती फक्त माझ्यापासून नातं तोडून जाणार होती पण बाहेर पाऊस असल्यानं पावसात भिजतही ती जाऊ शकत नव्हती. मी तिला आपल्या नात्याची तुटण्याची कारणं विचारत होतो. तिच्या बोलण्यातून मला हे कळतही होतं की कुठंतरी मीही चुकत होतो. तिला समजून घेण्यात मी कमी पडत होतो. बोलत बोलत खूप उशीर झाला पण पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. उशीर झाला म्हणून मी तिला तिच्या हॉस्टेलपर्यंत सोडायचं ठरवलं, पण बाहेर आलो तर, बाईकच पाण्यामुळे चालू होत नव्हती. चालतच निघालो.
भिजत पोहचलो हॉस्टेलपाशी. अचानक ती गेटजवळ जाऊन थांबली. मागे वळून माझ्याकडं एकटक पाहू लागली आणि जादू व्हावी तशी धावत माझ्या मिठीत येऊन लहान मुलं रडावं तशी रडू लागली.
पावसानं आमचं भांडण संपवलं होतं. त्या जलधारांच्या आशीर्वादानं अजूनही आम्ही एकत्रच आहोत. लवकरच आमचं शिक्षण पूर्ण होईल आणि लग्नाची बोलणी करायला मी तिच्या घरी जाईन.
- व्हीपीपी, गंगाखेड, परभणी
पाऊसवाटेवरचे दोस्त
पाऊसवाटेवरचे सोबत होत अनेक मित्रमैत्रिणींनी आपले अनुभव ‘ऑक्सिजन’ला लिहून पाठवले. सगळेच लेख जागेअभावी प्रसिद्ध करता येऊ शकले नाहीत. मात्र ज्यांचे लेख विशेष उल्लेखनीय होते, त्यांची ही नावं.
- ऑक्सिजन टीम
धनश्री संत (पुणे), संचिता सुरेश गायकवाड (अहमदनगर), वृंदा दीपक राव (देवपूर, धुळे), आकाश कुलकर्णी,
अभिषेक अनिल वाघमारे, रोहित गायकवाड, शीतल शिंदे (नाशिक), पूनम आनेराव (सोलापूर),
सुनील खोडके (डोणगाव, जि. बुलढाणा), ज्ञानेश्वर जाधव (तोरनाळे, जि. जळगाव),दयाल-कृष्ण (विद्यानगर ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर), साहेबराव मोरे (चाळीसगाव), हेमंतकुमार भोये (नाशिक), संतोष इंगळे (खामगाव, बुलढाणा), मोहन शिरसाट (वाशिम),
विक्रांत काटे (वाई, जि. सातारा), वैशाली अघोर (सोलापूर), महेश कोटीवाले ( वडवळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर), नयन राऊत.