- कलिम अजीम
पुण्यात पीजीसाठी आलो असल्यानंच माझ्या प्रादेशिक अस्मिता बळकट झाल्या. विद्यापीठात शिक्षण घेत असताना मुंबई-पश्चिम महाराष्ट्र विरूद्ध इतर असे आमचे ग्रुप्स तयार झाले. ग्रुप्स तयार होण्यामागे राजकीय आणि भौगोलिक कारणं होती. सतत विकासापासून वंचित ठेवल्याचा राग आणि मत्सर होता. रानडेच्या कॅण्टीनमध्ये तासन्तास प्रादेशिक अस्मितांबाबत वाद-विवाद व्हायचा. ग्रुप्समधला वाद क्लासरूममधून विशेष सेमिनार आणि चर्चासत्रापर्यंत प्रवास करायचा. विकास, डावललेपण, सापत्न वागणूक, अनुशेष केंद्रस्थानी ठेवत शिक्षक आणि वक्त्त्यांची आम्ही अनेकदा कोंडी केली.
विदर्भ, मराठवाडा, खान्देश, शेतकरी आत्महत्त्या, सिंचन, पाटबंधारे, एमआयडीसी, शिक्षण संस्था, राजकीय नेतृत्व अनेक गोष्टींत का डावललं, हा सवाल आमची प्रादेशिक अस्मितांची बळकटी करत होता. स्थलांतर होऊन पश्चिम महाराष्ट्रात आल्यानं इथल्या सार्वभौम विकासाची तुलना वारंवार करण्यात येऊ लागली. मराठवाडा असो वा विदर्भ यांच्या वाट्याला नेहमी स्थलांतरच आलं आहे. कधी-कधी प्रश्न पडतो की, पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ, पाणीटंचाई का नाहर, हे भोग विदर्भ- मराठवाड्यालाच का, या राजकीय प्रश्नांची उत्तरे आमची स्थलांतरितांची पिढी मिळवायचा प्रयत्न करते आहे. कदाचित याची उत्तरे शोधण्याकरितादेखील हे मायग्रेशन होत असावं. उद्योग, व्यवसाय आणि शिक्षण ही स्थलांतर होण्याची प्रमुख कारणं असली तरी, पाणीटंचाई आणि दुष्काळ हीदेखील स्थलांतराची मुख्य कारणे गेल्या वीसएक वर्षांपासून समोर येत आहेत.
गावं, घरे, वाडी-वस्ती सोडून शहरं आणि महानगरातलं प्रतिकूल वातावरण आमच्या या पिढ्या स्वीकारतात. बाहेरच्यांना सहज न स्वीकारणाऱ्या महानगरात रेल्वे स्टेशन, पब्लिक टॉयलेट, पाइपलाइन याव्यतिरिक्त झोपडपट्ट्यांच्या खोपट्यांच्या घरात स्थलांतरितांचे लोंढे स्थिरावतात. हे झालं निम्न मध्यमवर्गीयांच्या बाबतीत. मध्यमवर्गीय कुटुंबातून शिक्षणासाठी स्थलांतरित झालेल्या पोरांची शहरातली अवस्था पाहिल्यास कुठलेही पालक आपल्या मुलांना शहरात पाठवणार नाहीत कदाचित. पुण्यासारख्या शहरात वर्षाला कोट्यवधींचे उत्पन्न देणारे विद्यार्थ्यांचे लोंढे केवळ सहानभूती आणि प्रेमाचे भुकेले असतात. मात्र या मुलांना केवळ भाडोत्री म्हणूनच ट्रीट केलं जातं. खोपट्यांत राहण्याचे महिनागणिक पैसे ही मुलं देतातच. पण त्या बदल्यात योग्य सुविधा तर सोडाच प्रेमाचे दोन शब्द घरमालक बोलत नाहीत अनेकदा.
उलट टोकाचा हिनकसपणा आणि तुच्छतावाद सोसावा लागतो. पुण्यात मध्यवर्ती भागात विद्यार्थ्यांचे अनेक रहिवास आहेत. तिथलं त्यांचं राहणीमान हा संशोधनाचा विषय ठरू शकेल. पुण्याला पूर्वेचं आॅक्सफोर्ड म्हणून मार्केटिंग करण्यात आलं. केवळ मुक्त जगण्याच्या पळवाटेतून अनेकजण पुण्यात येऊन स्थिरावले. त्यात अवतीभोवती चिक्कार स्पर्धा. त्यामुळं विद्यार्थी सेल्फ स्टडीतून स्वत:ला सक्षम बनवतात. जे-या कॉम्पिटिशनला सामोरं जाऊ शकत नाही असे अनेकजण पाचएक वर्षांनंतर गावाकडं जाऊन स्थिरावतात. तर उरले-सुरले काहीजण आपला अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत असतात.
पुणे-मुंबईचं शैक्षणिक आयुष्य संपल्यानंतर स्थलांतरित पिढीचा खरा लढा सुरू होतो. कौशल्य असून, मेरीट नसल्यानं अनेकदा चांगल्या संधी हातातून निसटून जातात. तर काही बाबतीत मेरीट असूनही राहणीमान किंवा जेमतेम दिसणं हेदेखील संधी गमावण्याचं प्रमुख कारण समोर येतं.
मला आठवतंय, रानडे इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकत असताना एका प्रतिष्ठित इलेक्ट्रॉनिक चॅनलचे कॅम्पस इण्टरव्ह्यू झाले. उमेदवार निवडण्याचे निकष आमच्या पत्रकारितेच्या आदर्श अभ्यासक्र मात बसत नव्हते. पण डिग्रीचं शिक्षण संपल्यावर रोजगारीचा प्रश्न ‘आ’ वासून माझ्यासमोर उभा होताच. आई-बाबांनी शिक्षणावर केलेल्या गुंतवणुकीची परतफेड करायची म्हणून कॅम्पसला बसलो. लेखीनंतर जीडी सुरू झाली. दिलेल्या विषयावर पाच मिनिटांत ५ जणांच्या ग्रुपमध्ये विचार मांडायचे. पाच मिनिटांनंतर जो नुसतं बोलू शकेल (वायफळ) त्याची निवड झाली.
असे २५ जणांमधून केवळ ५ जणांची निवड झाली. जे उत्तम लिहित होते; पण केवळ बडबड करता आला नाही म्हणून बाहेर फेकले गेले. हा क्रूर स्पर्धेचा पहिला साक्षात्कार तिथं पहिल्यांदा झाला. जॉबसाठी केवळ कौशल्य हवं असतं, गुणवत्ता ग्राह्य धरली जातेच असं नाहीये. जो अनुभव माझा तोच मल्टिनॅशनल कंपन्यांच्या कॅम्पसमध्ये अनेकांना येतो.
या साऱ्याचा त्रास होतोच पण उत्तम जॉब आणि प्रतिष्ठा मिळत असल्यानं स्थलांतरित पिढ्यांनी शहरं स्वीकारली आहेत. ज्या महानगर आणि शहरांची हेटाळणी कधीकाळी ज्यांनी केली आज ती शहरे ‘आपली’ झाली आहेत. शहराचं भूमिपुत्र होणं आमच्या पिढीनं स्वीकारलं आहे.( लेखक महाराष्ट्र वन या वाहिनीत पत्रकार आहेत.)