- मोनाली म्हेत्रे
स्थलांतरामुळे फक्त व्यक्तिमत्त्व विकासच नव्हे तर मनाचा विकासही होतो. स्थलांतर करताना आप्तांना सोडून दूर जाण्याचा प्रसंग येतो; पण यामुळेच जीवन जगण्याची नवी उमेद, उत्साह, नवा दृष्टिकोन मिळतो. सर्व प्रसंगांना एकट्यानं व धीरानं तोंड देण्याचं बळ मिळतं.
मी मूळची फलटणची. प्राथमिक शिक्षण फलटणमध्येच झाले. शाळेत हुशार असल्यानं पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी आई-बाबांनी माझा प्रवेश पुण्यातील महर्षी कर्वेंच्या संस्थेत घेण्याचा निर्णय घेतला. एवढय़ा लहान वयातच घरापासून दूर राहण्याचा प्रसंग माझ्यावर आला. पहिले वर्ष खडतर गेलं; परंतु महिलार्शम शाळेचे संस्कार व शिक्षण पद्धतीमुळे शिक्षणात मन रमलं. रोज सायंकाळी रामरक्षा, भीमरूपी, गणेशस्तोत्र हॉस्टेलमध्ये पाठ करून घेतले जाई. या संस्थेत सातारा, नाशिक, नागपूर, वाघोली, औरंगाबाद, नांदेड अशा दूर दूर ठिकाणांहून शिक्षणासाठी आलेल्या प्रेमळ मैत्रिणी मिळाल्या. तसंच संस्थेच्या कडक शिस्तीमुळे सर्व गोष्टी वेळेवर करण्याची सवय लागली. लहानपणीच आपल्या स्वभावाविरोधी व समान गुणधर्म असणार्या लोकांमध्ये वावरायची सवय झाल्यामुळे माझ्यामध्ये वेगळाच असा आत्मविश्वास निर्माण झाला.
पुढे अकरावी-बारावी आणि इंजिनिअरिंगसुद्धा पुण्यातच झालं. इंजिनिअरिंगला असताना मित्र-मैत्रिणींनी माझ्यातील सुप्त गुण ओळखून डान्स, स्पोर्ट्समध्ये सहभाग घेण्यास प्रवृत्त केलं. त्यामुळे स्टेज डेअरिंग वाढलं. गुरुंच्या मार्गदर्शनामुळे पुढील प्रवासास दिशा मिळाली. पुण्यात मन रमलं; परंतु आज पुन्हा एकदा स्थलांतर करण्याची वेळ मजवर येऊन ठेपली आहे.
सध्या माझे अँडमिशन ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, अर्लिंगटन’ (कल्पना चावलानं पदवी घेतली ती युनिव्हर्सिटी) येथे झालं आहे. येत्या ऑगस्टमध्ये मी अमेरिकेकडे प्रयाण करणार आहे. पुढच्या पदवीसाठी, तेही निश्चिंत! लहानपणीच्या आई-बाबांच्या निर्णयामुळेच आज मी अगदी निर्भयपणे पुढील स्थलांतराचा निर्णय घेऊ शकले. एकटेपणाची भीती गेली. सर्व स्पर्धा परीक्षा पूर्ण करून, शैक्षणिक कर्ज घेणं, अँडमिशन प्रोसेस पूर्ण करणं, फ्लाइट तिकीट बुक करणं, युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये राहण्यासाठी अपार्टमेंट मिळवणं या सर्व गोष्टी स्वत: एकटीनं करू शकले.हा आत्मविश्वास हीच तर स्थलांतराची पुंजी आहे.