डॉ. संज्योत देशपांडे -
तुना जरा मला समजून घे, किंवा मला थोडं जरी समजून घेतलं असतंस ना, तर आज आपलं नातं असं तुटलं नसतं.असे डायलॉग आपण नेहमी मारतो. एक तक्रारही करतो की, मी सगळ्यांना समजून घेतो, पण मला कुणी समजून घेत नाही ! हे असं म्हणताना, खरंच आपल्याला आपल्या भावना, आपलं मन समजतं, असा दावा आपण स्वत:च्या संदर्भात तरी करू शकतो का ?
स्वत:च्या भावनांची हाताळणी करायला शिकणं ही खरं म्हणजे मोठी प्रक्रिया आहे. त्यासाठी आपला विचार करण्याच्या पद्धतीमध्ये जाणीवपूर्वक काही बदल करावे लागतात. काहीतरी बदल होतील आणि मग आपण बदलू असं म्हणून नाही चालत. तर त्यासाठी स्वत:च ठरवून बदलांना सामोरं जावं लागतं. आपण बदलायला हवं, अशी मानसिक तयारी करावी लागते. स्वत:च स्वत:ला फेस करण्याची तयारी करावी लागते. आपण जे जसे आहोत, तसं आधी स्वत:कडे पहायला हवं ! ते जमलं तर आपण आपल्या भावना उत्तम हाताळू शकतो.
आता मुख्य प्रश्न, पण म्हणजे करायचं क ाय ? ते सांगणार्या या काही सोप्या पायर्या. स्वत:च स्वत:ला पाहण्याचा आणि पाहून बदलण्याचा एक जादूई आरसा.
नो मोअर रिअँक्शन, टेक अँक्शन.
आपण आपल्या भावनांची जबाबदारी जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत स्वत:च्या वर्तनात खर्या अर्थानं बदल घडवून आणू शकत नाही. आपल्याला येणार्या रागाला, नैराश्याला, दु:खाला आपण जर सतत इतरांना किंवा नशिबाला जबाबदार धरलं, त्यांच्यावरच दोषारोप करत राहिलो तर भावनांची हाताळणी योग्य पद्धतीनं होत नाही. म्हणजे काय तर अनेकांना खूप राग येतो, ते चटकन चिडतात. मात्र आपल्याला जो काही राग येतो त्याला आपण स्वत: नाही तर इतरांचं वागणं आणि प्रतिक्रियाच जबाबदार असतात असं ते कायम म्हणतात.
पण खरं सांगा, नेहमी असं म्हणून कसं चालेल ?
आपली प्रत्येक प्रतिक्रिया ही दुसर्याच्या वर्तनावर आपण अवलंबून ठेवतो का ? कोणत्याही गोष्टीला प्रतिक्रिया द्यायची की प्रतिसाद द्यायचा हे आपण शिकलं पाहिजे. प्रतिक्रिया वेगळी प्रतिसाद वेगळा. कुणी आपल्याला चिडवलं की आपण चिडणार ही झाली प्रतिक्रिया. मात्र तो माणूस आपल्याशी असं का वागतोय याचा विचार करून आपण जी काही त्यावेळी कृती करू, त्याला शांतपणे जे सांगू तो प्रतिसाद. प्रतिसाद आपण आपल्या मर्जीनं देऊ शकतो. प्रतिक्रिया मात्र, आपण दुसर्याच्या कृतीनुसारच देतो.
मुळात आपल्या अवतीभोवती घडणार्या घटनांवर, इतर माणसांच्या वागण्यावर आणि अगदी नशिबावरसुद्धा आपलं काहीच नियंत्रण नसतं. पण स्वत:वर तर असतोच. आणि आपण कसं वागायचं, काय बोलायचं, किती चिडायचं, रडायचं, शांत रहायचं हे आपलं आपण ठरवायचं. ते ठरवलं तरच आपण आपल्याला मदत करणार्या भावनाचं आणि त्या अनुभवण्याचं प्रमाण वाढू शकू.
बोला, मोकळे व्हा.
आपल्या आसपासच्या, जवळच्या काही व्यक्तींविषयी आपल्याला कधीकधी खूप राग येतो, मनात अढी तयार होते, एखादी गोष्ट नाहीच आवडत, कधी ्रआपण रुसतो, कधी चिडतो त्यांच्यावर. पण नको मन दुखवायला म्हणून आपण गप्प बसतो. सारं मनातल्या मनात दाबून टाकतो. तो माणूस गमावण्याची भीतीही त्यात असतेच. पण त्यामुळे त्या नात्यातले प्रश्न सुटत नाहीत उलट नात्यातला दुरावा आणखी वाढतो. आतल्या आत मन अणि नातं पोखरलं जातं. तेच प्रेमाचंही, मायेचंही. आस्थेचं आणि कृतज्ञतेचंही. समोरच्या विषयी मनात अपार प्रेम असताना आपण ते बोलून दाखवत नाही. उगीच शब्दात काय सांगायचं म्हणत गप्पं बसतो. अािण मनात प्रेम असूनही अनेक नात्यात ओलावा येत नाही.
मुद्दा काय आपण कायम असे मुखवटे घालूनच राहतो. हे असं गप्प बसून जे वाटतं ते लपवण्यापेक्षा, बोला. बोलून मोकळं व्हा. फक्त जे बोलायचं ते योग्य शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करा.
स्वत:ची काळजी घ्या
स्वत:ची किती काळजी घेतो आपण विचारा स्वत:ला. वेळच्या वेळी खा, व्यायाम करा, चांगली जीवनशैली स्वीकारा. खायचंच नाही, उपाशीच रहायचं, झोप नाही, व्यायाम नाही. धड आराम नाही, हे चक्र सतत सुरूच राहिलं, तर मात्र अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. आपण खाण्यापिण्याचं, व्यायामाचं, आरामाचं चक्र जरी आपण नीट लावलं तरी मनावरचा ताण कमी व्हायला, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला खूप मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूतकाळात चिघळलेल्या जखमांवर खपल्या धरू द्या. त्या उकलू नका. स्वत:ला छळत बसू नका.
आळस झटका, कामाला लागा.
मुळात आपल्या मनात ज्या काही उदास, निगेटिव्ह भावना होतात, त्याला काही अंशी आपणही जबाबदार आहोत हे जरा मान्यच करून टाका. आणि आपण म्हणजे आपल्या काही अत्यंत चुकीच्या, घाणेरड्या सवयी. आळशीपणा, कामात सतत चालढकल करणं, व्यसन करणं, कोणत्याही गोष्टीत पुढाकार न घेणं, सतत काही करण्याची टाळाटाळ करणं, ठरवलेलं किंवा गरजेचं काहीच न करणं हे सारं आपण नियमित करत असू तर आपल्या मनात प्रचंड नकारात्मक भावना तयार होतात. काहीच धड होत नाही, असं म्हणत दोष देत राहतो. खरंतर या सवयी हाच आपला एक कम्फर्ट झोन बनून गेलेले असतो. त्यामुळे त्या सवयी बदलायचा नुस्ता विचार जरी मनात आला, तरी एक प्रकारची अस्वस्थता येते. आपलं मन त्या बदलांना विरोध करत राहतं. त्यामुळे असे बदल करताना आपल्याच मनानं केलेला विरोध मोडून काढावा लागतो. स्वत: छोटे-छोटे बदल रोज करत रहावे लागतात. छोटे बदल सहजतेने जमतातही मग आपलाही उत्साह वाढत जातो. तो टिकवून धरणं मात्र फार महत्त्वाचं !
ऑप्शन तयार ठेवा.
आपल्याला एकदा कळलं ना की, मला खूप राग येतो. चटकन डोळ्यात पाणी येतं. खूप टेन्शन येतं. तसं झालं की, स्वत:वरचा कण्ट्रोल जातो. मग त्याच्या पुढे जाऊन आपण विचार करायला हवं की, या मला माझ्या ओळखू येणार्या भावना मनात जाग्या झाल्या तर मी कसं वागेन ? त्याक्षणी, त्यावेळी काय करेन? स्वत:च्या खूप त्रासदायक भावनांना सामोरं जाण्याच्या ऑप्शन्सचा मी काही विचार करून ठेवू शकेल का ?
उदा. मी खूप चिडका आहे. मला खूप राग येतो, पटकन येतो. असा राग आला तर मी काय करेन ? अशा पर्यायांचा विचार करा, स्वत:ला त्याक्षणी काय करावंसं वाटेल, हे ठरवा आणि ते सतत लिहून ठेवा.
१) चालायला जाणं- बर्याचदा अशा तीव्र भावनांची तीव्रता काही शारीरिक हालचालींनी, व्यायामानं कमी व्हायला मदत होते व त्यामुळे आपण नेमका काय विचार करतो आहोत, आपल्याला काय वाटतं आहे, हे समजायला मदत होते.
२) चित्र काढीन अथवा गाणं ऐकीन, जेणेकरून मला थोडं बरं वाटेल. थोडं शांत वाटेल.
३) खूपच उदास आणि निराश वाटत असेल, तर मित्राशी/ मैत्रिणीशी फोनवरून मनमोकळ्या गप्पा मारीन. दुसर्याच विषयावर बोलेन.
४) घरात आवराआवरी करेन. पसारा आवरेन, स्वच्छता करीन.
५) दीर्घ श्वसन करेन.
६) थोडावेळ झोप काढेन.
७) स्वयंपाक करेन किंवा एखादा छानसा रुचकर पदार्थ बनवेन.असे पर्याय हे त्या भावनांवर काढलेलं ‘तात्पुरतं’ उत्तर असतं. पण नंतर मात्र सखोल विचार करा. आणि तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.