-नितांत महाजन
एक फ्रेज सध्या मोठय़ा चर्चेच आहे. टेकिंग अ ब्रेक. हा ब्रेक कोणता? कामातला, शिक्षणातला, जॉबचा.या सगळ्यातला ब्रेक तर आहे; पण त्याला ड्रॉप असंही म्हणतात. अनेकजण शिक्षण सोडतात आणि वर्षे-दोन वर्षे ड्रॉप घेतात. त्याकाळात नवीन काहीतरी करतात.काहीजण नोकरी करतात. मग चार-पाच वर्षे नोकरी करून, त्या नोकरीतून म्हणजे जॉबमधून ड्रॉप घेतात आणि पुन्हा शिक्षणाकडे वळतात. एकच एक नाकासमोर करत बसण्याचा काळ गेला, हे तर उघड आहे. रुटीनचा कंटाळा येणं किंवा काही काळ एखादी गोष्ट करून पाहणं ती आवडली तर करणं किंवा मग ब्रेक घेणं हे सारं मिलेनिअल्सच्या जगात काही नवीन नाही.
आता मात्र एका नव्या परिभाषेत हा शब्द अवतीभोवती वावरतो आहे. टेकिंग अ ब्रेक इन अ रिलेशनशिप.आता कुणाला असं वाटेलही की रिलेशनशिप म्हणजे काय डेलीसोप आहे का, काही मिनिटांचा ब्रेक घ्यायला. ब्रेक संपला की, डेलीसोप सुरू.
अगदी असंच नसलं तरी प्यारव्यारवाल्या रिअल डेलीसोपमध्येही आता काहीजण ब्रेक घ्यायला लागले आहेत. त्यालाच टेकिंग अ ब्रेक इन रिलेशनशिप असं म्हणतात.
या ब्रेक आणि ब्रेकअपमध्ये फरक आहे.
ब्रेकअप म्हणजे संपलंच सगळं. पण हे नात्यात ब्रेक घेणं आहे.
हा विषय आपल्याकडे पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे अलीकडेच गॉसिप होतं की सुशांत सिंग राजपूत आणि त्याची मैत्रीण कृती सेनन यांनी ‘रिलेशनशिप ब्रेक’ घेतला आहे. आता त्यांनी आपण रिलेशनशिपमध्ये आहोत हेच माध्यमांसमोर कबूल केलं नव्हतं त्यामुळे असा ब्रेक त्यांनी खरंच घेतलाय की नाही हे आपल्याला कळायचं काहीच कारण नाही. तो त्यांचा अगदी व्यक्तिगत प्रश्न आहे, त्याची चर्चा करत बसण्याचंही कारण नाही. मात्र यानिमित्तानं आपल्याकडेही प्रेमाच्या नात्यात असे ‘ब्रेक’ आताशा घेतले जातात या नव्या रिलेशनशिप ट्रेण्डची मात्र चर्चा करायला हवी.
इतकी वर्षे फक्त अमेरिकन डेटिंग कल्चरमध्ये ब्रेक घेतले जायचे. आता मात्र आपल्याहीकडे हे सारं सुरू झालं आहे.पालकांना कितीही धक्का बसला किंवा पालक कितीही उदारमतवादी असले तरी कालपर्यंत आपला मुलगा कुणाच्या तरी प्रेमात आहे आणि आज म्हणतोय की, आम्ही वर्षभराचा ब्रेक घेतलाय हे काही पालकांना पचणारं नाही.मात्र प्रेमात पडलेल्या अनेक मुलामुलींच्या आयुष्यात हा ब्रेकचा स्वल्पविराम आता येऊ लागला आहे. अनेकदा लग्न करायचं असं नक्की ठरवल्यावरही काहीजण काहीकाळ ब्रेक घेऊन पाहतात. आणि त्या ब्रेकमध्ये आपलं स्वत: विषयीचं, नात्याविषयीचं आणि जोडीदाराबद्दलचंही एक मत ठरवतात. त्यावर नात्याच्या भवितव्याचा निर्णय करतात. काही तर एवढाही विचार करत नाही, आता सध्या कामाचा फोकस वेगळा आहे असं म्हणत वेगळे होतात काही काळ.
मुळात हे टेकिंग ब्रेक इन अ रिलेशनशिप प्रकरण वाटतं तितकं उथळ नाही. किंवा काहीतरी आचरटपणा जबाबदारी टाळणंही नाही.
तो आहे एक निव्वळ प्रॅक्टिकल विचार.
परस्परांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असले दोघेही तरी शेवटी किती काळ अगदी बांधून घेणार करकचून एकमेकांना. नात्यात श्वास घेण्याची तरी स्पेस लागतेच. छोड दे सारी दुनिया किसी के लिए. हे एरव्ही रोमॅण्टिक वाटलं तरी प्रत्यक्षात प्रेमात पडूनही याच जगात राहावं लागतं. शिक्षण, नोकरी, जॉब, त्यातले टेन्शन, बाकीचे मित्रमैत्रिणी, आपल्या आवडीनिवडी हे सारं सोबत असतंच. आणि जर नातं डिमाडिंग व्हायला लागलं तर मग जगण्याचा बॅलन्सही जरा चुकायला लागतो.
तो चुकतोय हे वेळीच लक्षातही येत नाही.
म्हणजे होतं काय.
कंटाळा येईपर्यंत प्रेम
पूर्वीच्या काळी निदान लोक लग्न झाल्यावरच एकत्र रहायचे. सतत चोवीस तास एकत्र राहण्याचे फायदे-तोटे लग्नानंतरच कळत. आता तंत्रज्ञानानं ती स्पेसही हिरावून घेतली आहे. आपण प्रत्यक्षात एकत्र असो नसो आपल्या हातातल्या सोशल मीडियासह फोनमुळे सतत गर्दीतच असतं. सतत कुणी ना कुणी काही ना काही बोलतच असतं. त्यात प्रेमात पडलेले असतील तर विचारायलाच नको.
सतत फोन आणि व्हॉट्सअँपच्या दावणीला बांधलेलेच. सतत त्या ब्लू स्टिकची आणि लास्ट सिनची दहशत. सतत ऑनलाइन. शून्य रिंगमध्ये उचलला जाणारा फोन. कोण कुणाला किती फोन करतो याचे हिशेब. आपण कुठल्याही भौगोलिक परिस्थितीत असलो तरी फोनमुळे कायमच एकाच मनोवस्थेत रहावं लागतं. प्रेमात आकंठ बुडालेलो असलो तरी सतत प्रेमाचं पाणी नाकातोंडात जाऊन कसं चालेल? जीव गुदमरणारच.
तो गुदमरतोच. सतत रोमॅण्टिक नाहीच राहता येत. मग भांडणं होतात. त्यावरून सतत चिडचिड. अस्वस्थता. सततची भांडणं. गैरसमज. खुलासे-प्रतिखुलासे यात सगळी ऊर्जा खर्च होते. काही चांगलं घडत नाही. फक्त रिलेशनशिपमध्ये आहोत याचा ताण वाढतो असं अनेक मुलंमुली सांगतात.
आता हे सारं होतं म्हणजे प्रेम नसतं असंही नाही. नातं तोडून टाकावं का असंही नाही. त्या माणसाचा राग येतो, तिरस्कार वाटतो का असंही नाही.
पण तरीही थोडा मोकळा श्वास हवा असतो.
थोडी फुरसत. थोडी मोहलत मनासारखं जगण्याची. काम करण्याची. खुलासे न देण्याची.
त्यावर आता हा एक नवा प्रकार नात्यांच्या जगात आला आहे. रिलेशनशिप ब्रेक. आपल्याकडे प्रेमात पडलेली जोडपी अजून तरी थेट एकमेकांबरोबर राहत नाहीत; पण तिकडे विदेशात राहतात. त्यांच्याकडे तर परस्परांहून वेगळे राहत असा निर्णय अमलात येतो.
आपल्याकडे मात्र थोडा दुरावा, थोडा अबोला, कमी किंवा संपर्कच बंद करणं या टप्प्यात हे नातं काही काळ ब्रेक म्हणून नेलं जातं.
रिलेशनशिप ब्रेकची कारणं काय?
खरं तर प्रत्येक नात्यात काय होतं, हा अत्यंत खासगी मुद्दा आहे, तरीही आताशा काही ठोस कारणं दिसतात. त्यातली अनेक कारणं प्रॅक्टिकल गोष्टींवर बेतलेली असतात.त्यातली ही काही कारणं.
1. फोकस.
अनेकदा प्रेमात पडलं की फोकस हलतो. पण अनेकदा शिक्षण किंवा काम, काही महत्त्वाची वर्षे किंवा महिने. परीक्षेचे काही महिने. नवीन नोकरी किंवा प्रोजेक्ट. हे सारं अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात येऊन पोहचतं. केवळ प्रेमात आहोत म्हणून या सार्यावर पाणी सोडणं, परिणाम होऊ देणं हे परवडणारं नाही. तेव्हा अनेकजण याकाळात रिलेशनशिपमध्ये ब्रेक घेतात. लांब राहतात परस्परांहून. संपूर्ण संवाद तरी थांबवतात. किंवा जेमतेम कामापुरता संपर्क ठेवतात. फिरणं, सिनेमे, गप्पा सगळं बंद करतात.
2. डाउट
काहींना डाउट वाटतो आपल्याच नात्याविषयी. वाटतं, आपण कमिट तर केलं; पण खरंच आपल्याला हे नातं हवंय का? मग त्यावर तोडगा म्हणून काहीकाळ दूर राहून पाहतात. केवळ सवय आणि ब्रेकअपची भीती म्हणून आपण नातं निभावतोय का हे तपासून पाहतात.
3. रुटीनचा कंटाळा
अनेक मुलं रुटीनलाच कंटाळतात. त्याच त्या नोकर्या. कार्पोरेट प्रेशर. त्यात नात्याचं प्रेशर. आपण कुठंच पुरं पडत नाही. नको हा अपेक्षांचा डोंगर असं त्यांना वाटतं. मग नात्यात ब्रेक घेत अनेकजण बॅगपॅक करत फिरायलाही निघून जातात.
ब्रेकचे डूज अँण्ड डोण्ट्स
* दोन्ही जोडीदारांना मान्य असेल तरच हा ब्रेक घेणं उत्तम.* ब्रेक कशासाठी घेतलाय हे माहिती हवं. त्यावेळात आपल्या कामावर फोकस करता यायला हवा.* ब्रेक घेतल्याचा गावभर डिंडोरा पिटण्याची गरज नाही.* फोन, सोशल मीडियापासूनही याकाळात दूर राहिलं तर ब्रेकचे फायदे होतात.* सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेक आणि ब्रेकअप यातला फरक लक्षात ठेवला पाहिजे.