मुंबई : आमच्यावर सध्या फिरकी गोलंदाजी योग्यपध्दतीने खेळत नसल्याची टीका होत आहे. परंतु, माझ्या मते आम्ही फिरकी गोलंदाजी वाईटपणे खेळत नसून दुर्दैवाने आमच्या विकेट्स फिरकी गोलंदाजीवर अधिक गेल्या आहेत, असे भारताचा भरवाशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने सांगितले. शुक्रवारी मुंबईतील सीसीआय येथे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याच्या ‘द इनसाइडर’ पुस्तकाचे भारताचा माजी कर्णधार राहूल द्रविड व अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी रहाणेने आपले मत व्यक्त केले.श्रीलंकेविरुध्दच्या मालिकेमध्ये आम्ही फिरकी गोलंदाजीविरुध्द अधिक बाद झालो. यापुर्वी आॅस्टे्रलिया, दक्षिण आफ्रिकेविरुध्द वेगवान गोलंदाजी यशस्वीपणे खेळलो. मला नाही वाटत आम्ही फिरकी गोलंदाजी वाईट खेळतो. मात्र लंकेच्या फिरकीपटूंना त्यांचे श्रेय नक्कीच द्यावे लागेल. त्यांनी सुरेख मारा केला, असेही रहाणे याने सांगितले.क्रिकेटच्या बदललेल्या स्वरुपाबद्दल रहाणे म्हणाला की, आज क्रिकेट अधिक वेगवान झाले आहे. आम्ही व्यावसायिक खेळाडू असल्याने क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपामध्ये खेळण्यास तयार राहण्याची सवय झाली असून ते आमच्या मनात पक्के असते. त्यामुळे आम्ही मानसिकरीत्या कायम तयार असतो. परदेशातील परिस्थितीशी जुळवून खेळणे महत्त्वाचे असते. आॅस्टे्रलिया, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका येथे खेळणे माझ्यासाठी कायम आव्हानात्मक असते.आगामी आॅक्टोबर महिन्यात सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत यजमान ‘टीम इंडिया’च्या तयारीबाबत राहूल द्रविड म्हणाला की, या मालिकेसाठी भारताकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुरली विजय दुखापतीतून सावरुन पुनरागमन करेल. त्याचबरोबर शिखर धवन, लोकेश राहूल आणि रहाणे यांच्या रुपाने भक्काम फलंदाजी असेल. शिवाय चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यामुळे फलंदाजीला बळकटी येईल. या सर्वांवर भारतीय क्रिकेट अवलंबून असल्याने भविष्यात यांची कामगिरी कशी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.(क्रीडा प्रतिनिधी)
आम्ही फिरकी गोलंदाजी चांगली खेळतो : अजिंक्य रहाणे
By admin | Published: September 04, 2015 11:00 PM