धरमशाला : पाकिस्तानविरुद्ध डकवर्थ लुईस नियमामुळे निसटता पराभव पत्करावा लागल्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला इंग्लंड महिलांचे आव्हान पेलण्यास सज्ज झाल्या आहेत. धरमशाला येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय अत्यावश्यक आहे. पाकविरुद्ध पावसामुळे झालेला पराभव विसरून भारताला पुन्हा एकदा विजयी मार्गावर आणण्याची जबाबदारी कर्णधार मिताली राज, झूलन गोस्वामी आणि हरमनप्रीत कौर यांच्यावर असेल. त्याचवेळी सलामीच्या सामन्यात चार्लोट एडवडर््सच्या नेतृत्वामध्ये खेळणाऱ्या इंग्लंडने बांगलादेशला सहज लोळवले असले तरी, दुसऱ्या सामन्यात भारताचे कडवे आव्हान असल्याची जाणीव असल्याने इंग्लंड सर्वोत्तम कामगिरीच्या प्रयत्नात असतील. एडवडर््सचा खेळ बांगलादेशविरुद्धच्या विजयामध्ये निर्णायक ठरला होता. तिने शानदार अर्धशतक झळकावताना आपली चमक दाखवली होती. तसेच टैली बीमोंट, नतेली स्कीवर यांच्यावरही फलंदाजीची मदार असेल. त्याचप्रमाणे कॅथरीन ब्रंटचा अष्टपैलू खेळ इंग्लंडसाठी निर्णायक असेल.दुसरीकडे यजमान भारतासाठी कर्णधार मिताली फलंदाजीचा आधारस्तंभ आहे. वेदा कृष्णमूर्ती, वेलास्वामी वनिता, हरमनप्रीत कौर यांच्यावरही भारताचा विजय अवलंबून आहे. गोलंदाजीमध्ये अनुभवी झूलनच्या नेतृत्वाखाली शिखा पांडे, पूनम यादव आणि अनुजा पाटील अचूक मारा करण्यास सज्ज आहेत. (वृत्तसंस्था)> भारत : मिताली राज (कर्णधार), एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, थिरुष कामिनी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मानधना, निरंजन नागार्जन, शिखा पांडे, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, वेलास्वामी वनिता, सुषमा वर्मा व पूनम यादव.इंग्लंड : चार्लोट एडवडर््स (कर्णधार), टैमी बीमोंट, जॉर्जिया एल्विस, नताशा फरांट, लिडिया ग्रीनवे, रेबेका ग्रंडी, जेनी गुल, डॅनियल हेजल, एमी जोंस, हीथर नाइट, नटाली स्किवर, अन्या श्रबसोल व डॅनियल वॅट्ट.
भारतीय महिलांपुढे खडतर आव्हान
By admin | Updated: March 22, 2016 02:54 IST