ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी रविवारी शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मनोहर यांच्या पुनरागमनाने बीसीसीआयत श्रीनिवास पर्वाची अखेर झाली असून आयपीएल फिक्सिंगप्रकरणामुळे डागाळलेल्या बीसीसीआयची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान मनोहर यांच्यासमोर आहे.
रविवारी मुंबईत बीसीसीआयची सर्वसाधारण सभा पार पडली. शरद पवार, सौरव गांगुली आदी मंडळी या बैठकीला उपस्थित होती. जगमोहन दालमिया यांच्या अकाली निधनाने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. श्रीनिवासन गटाने माघार घेतल्याने तसेच देशातील सर्व झोन्सनी शशांक मनोहर यांना पाठिंबा दिल्याने मनोहर यांची निवड निश्चित मानली जात होती. रविवारी बीसीसीआयच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बीसीसीआयची प्रतिमा उंचावण्यासाठी मनोहर यांनी १० सूत्री अजेंडा तयार केला आहे. बीसीसीआयमध्ये शिस्तपालन अधिकारी नेमला जाणार असून बीसीसीआयच्या सर्व बैठकी यापुढे बीसीसीआयच्या मुख्यालयातच होतील अशी तयारीही मनोहर यांनी केल्याचे समजते.