ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ९ : बिजिंग आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेत तमाम भारतीयांना आनंदोत्सवाचा गोल्डन चान्स देणाऱ्या अभिनव बिंद्राचा रिओ आॅलिम्पिकमध्ये नेम चुकला अन् त्यानं त्याचक्षणी आपली रायफल ‘ठेवून’ दिली. ‘‘तुम्हाला रायफल हवी असेल, तर माझ्याकडे विक्रीला आहे... कोणी तरी चौथ्या स्थानी असणारच होते आणि आज ते स्थान माझ्यासाठी होते...’’ अशी सल संयमी अन् शांत मनातून व्यक्त करत मला माझ्या कारर्किदीचा शेवट पदकाने करायचा होता पण, शेवटी त्यासाठी नशिबेने सुध्दा सात द्यायला पाहिजे ते माज्या बरोबर ते आज नव्हते. आता मी थांबणार असे अभिनवने सांगितले.
कारकिर्दीतील अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा खेळणारा ‘गोल्डनबॉय’ नेमबाज अभिनव बिंंद्रा अखेर इतिहास नोंदवण्यात अपयशी ठरला. सोमवारी बिंद्राचे रिओ आॅलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल नेमबाजीमध्ये कांस्यपदक हुकल्यामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या निराशा पदरी पडली.
आॅलिम्पिक इतिहासात भारताच्या एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक विजेत्या बिंद्राला कांस्यपदक जिंकण्याची संधी होती. पण त्याला १६३.८ च्या स्कोअरसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत लंडन आॅलिम्पिकचा कांस्यपदक विजेता गगन नारंग अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. पात्रता फेरीत तो २३ व्या स्थानी होता.
भारताच्या आॅलिम्पिक इतिहासातील सर्वांत यशस्वी खेळाडू बिंद्राने आॅलिम्पिकला प्रारंभ होण्यापूर्वी खेळाडू म्हणून त्याच्या कारकिर्दीतील ही अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा असल्याचे जाहीर केले होते. बिंद्राने या आॅलिम्पिकच्या उद््घाटन समारंभात भारतीय पथकाचा ध्वजवाहक म्हणून भूमिका बजावली. तो आपल्या मोहिमेचा शेवट आॅलिम्पिक पदकाने करेल, अशी सर्व देशवासीयांची अपेक्षा होती; पण टेनिस स्टार लिएंडर पेसप्रमाणे बिंद्राचे स्वप्नही पूर्ण होऊ शकले नाही.
बिंद्रा अखेरच्या क्षणापर्यंत कांस्यपदकाच्या शर्यतीत होता; पण शूटआऊटमध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला. २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या बिंद्राला चार वर्षांनंतर लंडन आॅलिम्पिकमध्ये अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवता आली नव्हती. लंडनमध्ये गगन नारंगने या इव्हेंटमध्ये कांस्यपदक पटकावले होते. बिंद्रा रिओमध्ये अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला; पण पदकाला गवसणी घालण्यात त्याला अपयश आले.