नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाच्या सध्याच्या दौ-यात टीम इंडियाची कामगिरी ढेपाळली आहे. पण, तरीही आगामी विश्वचषकात संभाव्य दावेदारांमधून भारताला वगळणे हे मूर्खपणाचे ठरेल, असे मत न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज ज्योफ अॅलोट याने व्यक्त केले आहे.२३ वर्षांनंतर विश्वचषकाचे आयोजन मायदेशात होत असल्याबद्दल १९९९च्या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा संयुक्त गोलंदाज ठरलेला अॅलोट आनंदी दिसला. तो म्हणाला,‘‘भारताविरुद्धची लढत ‘बिग फाईट’ असते. अलीकडे त्यांची कामगिरी ढेपाळली हे खरे आहे, पण अन्य संघांच्या तुलनेत त्यांच्या जमेची बाजू अशी की, ते आॅस्ट्रेलियात खेळत आहेत. त्यांना संभाव्य दावेदारांमधून वगळणे मूर्खपणाचे ठरेल.’’अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञांनी संभाव्य दावेदार म्हणून यजमान संघाला झुकते माप दिले. न्यूझीलंडने सहा वेळा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली, पण एकदाही त्यांना प्रतिष्ठेचा चषक जिंकता आला नाही. यावर अॅलोट म्हणाला, ‘‘यंदा आम्ही विश्वचषक जिंकावा असे मला मनापासून वाटते. व्यवस्थापन आणि खेळाडूंनी वर्षभरात मेहनतही घेतली. उत्तम क्रिकेट खेळणारा न्यूझीलंड हा सध्या एकमेव संघ आहे.’’न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा संचालक असलेला हा ४३ वर्षांचा माजी गोलंदाज पुढे म्हणाला, ‘‘संभाव्य विश्वचषक कडवी झुंज अनुभवणारा असेल. आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका बलाढ्य आहेतच, पण आठ संघ असे आहेत, की ज्यापैकी कुणीही विश्वचषकावर नाव कोरू शकतो.’’ आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांनी १९९२ मध्ये संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषविले. त्यात न्यूझीलंडने १४ तर आॅस्ट्रेलियाने २५ सामने आयोजित केले होते. यंदा आॅस्ट्रेलियात अंतिम सामन्यासह २६ आणि न्यूझीलंडमध्ये २३ सामन्यांचे आयोजन होणार आहे. (वृत्तसंस्था)
दावेदारी नाकारणे मूर्खपणा : अॅलोट
By admin | Updated: January 28, 2015 02:14 IST