बंगळुरू : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रविवारी दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ शक्य झाला नाही. दिवसभर मुसळधार पाऊस असल्यामुळे पंचांपुढे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता. मैदानावरील कर्मचाऱ्यांनी खेळपट्टीवर कव्हर टाकले. पाऊस न थांबल्यामुळे पंचांनी १२.३० वाजता उपाहार झाल्याचे जाहीर केले. त्यानंतरही पाऊस न थांबल्यामुळे पंच इयान गाउल्ड व रिचर्ड केटेलबोरोग यांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात यानंतरही पावसाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी जर पावसामुळे खेळ शक्य झाला नाही तर सामना निकाली ठरण्याची शक्यता धूसर होईल. सोमवारी वातावरण चांगले राहिले तर सामना ९ वाजून १५ मिनिटांनी प्रारंभ होईल. सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव ५९ षटकांत २१४ धावांत संपुष्टात आला. रविचंद्रन आश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी चार बळी घेत दक्षिण आफ्रिका संघाचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिका संघातर्फे १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या डीव्हिलियर्सने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात खेळताना भारताने चांगली सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी यजमान संघाने बिनबाद ८० धावांची मजल मारली होती. त्या वेळी शिखर धवन (४५) आणि मुरली विजय (२८) खेळपट्टीवर होते. (वृत्तसंस्था)सकाळच्या सुमारास तुरळक पावसाला सुरुवात झाली होती. १० वाजण्याच्या सुमारास पाऊस थांबला. खेळ १०.३० वाजता प्रारंभ होणार असल्याचे पंचांनी जाहीर केले. खेळाडूंनी त्यासाठी तयारीला सुरुवात केली; पण सामना सुरू होण्यास पाच मिनिटांचा अवधी शिल्लक असताना पुन्हा तुरळक पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर मुसळधार पाऊस झाला.
दुसऱ्या दिवशी पावसाचे वर्चस्व
By admin | Updated: November 16, 2015 02:48 IST