कर्नूल (आंध्र प्रदेश) : गोजू रियु कराटे डू मार्शल आर्ट असोसिएशन (जीकेएमए)च्या वतीने नुकताच झालेल्या १२व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मुंबईकर कराटेपटूंनी आपली छाप पाडताना एकूण सहा सुवर्ण पदकांची लयलूट केली. आंध्र प्रदेशमधील कर्नूल येथे झालेल्या या स्पर्धेत दहा राज्यांतील कराटेपटूंनी सहभाग घेतला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'काता' अन् 'कुमिते' या दोन प्रकारात प्रत्येकी ३-३ सुवर्ण
तब्बल ८५० हून अधिक कराटेपटूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत मुख्य आयोजक म्हणून सेन्साइ जगदीश कुमार यांनी जबाबदारी सांभाळली. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक कीर्तन कोंडुरू, 'एकेएफ; रेफ्री कमिशन सदस्य शिहान शाहीन अख्तर यांच्या उपस्थितीत पदकविजेत्यांना गौरविण्यात आले. 'काता' प्रकारामध्ये मुंबईच्या सागर सिंग, देव किनखाबवाला आणि निर्मल जरगा यांनी सुवर्ण पदक पटकावले. तसेच, 'कुमिते' प्रकारामध्ये दिवाक्षी मेहता, निराली चौरसिया, आर्यन दिवाकर यांनी मुंबईच्या खात्यात सुवर्ण पदकाची भर पाडली.
या कराटेपटूंनी रौप्य अन् कांस्य पदकाची कमाई
त्याचप्रमाणे, 'काता' प्रकारामध्ये कांचन विश्वकर्मा, दिवाक्षी मेहता, निराली चौरसिया, क्रिश गांधी यांनी रौप्य पदक, तर निरव जाधव याने कांस्य पदकाची कमाई केली. 'कुमिते' प्रकारामध्ये सागर सिंह आणि ऋषभ विश यांनी रौप्य पदक, तर नायेशा सोनवणे, क्रिश गांधी आणि निर्मल जरगा यांनी कांस्य पदकावर नाव कोरले. मुंबईच्या कराटेपटूंनी 'जीकेएमए', मुंबईचे अध्यक्ष व संस्थापक शिहान प्रेम खडका यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत सिहान शंकर विश्वकर्मा, सेन्साई किरण खोत, सेन्साई खेम जरगा आणि सेंपाई अतुल सुखये यांनी रेफ्री व जज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.