नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिकेबाबत अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही, असे विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान पुन्हा द्विपक्षीय क्रिकेट मालिका प्रारंभ करण्यासाठी प्रयत्नशील असलेले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान यांच्या अलीकडेच झालेल्या भारत दौऱ्यावर टिप्पणी करताना सुषमा स्वराज यांनी हे वक्तव्य केले. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्यासोबत कोलकाता येथे संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी यंदा डिसेंबर महिन्यात युएईमध्ये तीन कसोटी, पाच वन-डे व दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव ठेवला होता. ‘बीसीसीआय’ने मात्र या मालिकेबाबत व स्थळाबाबत अद्याप अधिकृत वक्तव्य केलेले नाही. पाकिस्तानसोबत भारताच्या द्विपक्षीय क्रिकेट मालिकेच्या आयोजनाबाबत विचारले असता स्वराज म्हणाऱ्या, ‘अद्याप याबाबत कुठलाच निर्णय झालेला नाही. भारत-पाक क्रिकेट मालिकेच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, हे वृत्त कुठून आले, याची कल्पना नाही. माझ्यासोबत अद्याप चर्चा झालेली नसून, निर्णय झालेला नाही.’२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय कसोटी मालिका खेळलेली नाही. या घटनेनंतर उभय देशांदरम्यानच्या द्विपक्षीय क्रिकेट संबंध संपुष्टात आले आहेत. उभय देशांदरम्यान २०१२ मध्ये तीन वन-डे व दोन टी-२० सामन्यांची मालिका भारतात खेळली गेली होती. या व्यतिरिक्त उभय देशांदरम्यान केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये लढती झालेल्या आहेत. २००९ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ सहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर पाकिस्तानचा दौरा करणारा पहिला कसोटी संघ ठरला आहे. झिम्बाब्वे संघ सध्या दोन टी-२० व तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. (वृत्तसंस्था)
भारत-पाक मालिका अधांतरीच
By admin | Updated: June 1, 2015 01:40 IST