कुआनतन (मलेशिया) : ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगने हॅट््ट्रिकसह नोंदविलेल्या चार गोलच्या जोरावर भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा रविवारी अंतिम लढतीत ६-२ ने धुव्वा उडवला आणि ज्युनिअर आशिया कप हॉकी स्पर्धेत तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला.प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत अपराजित राहताना जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. हरमनप्रीतने १०, १५, ३० आणि ५३ व्या मिनिटाला गोल नोंदवले, तर अरमान कुरेशीने ४४ व्या, तर मनप्रीतने (ज्युनिअर) ५० व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. पाकिस्तानतर्फे याकूब मोहम्मदने २८ व्या, तर दिलबर मोहम्मदने ६८ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. भारतीय संघाने मध्यंतरापर्यंत ३-१ अशी आघाडी घेतली होती. भारतीय संघाला पाकिस्तानकडून आव्हान मिळण्याची आशा होती. भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत लढत एकतर्फी केली. भारताने या स्पर्धेत साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकल्यानंतर उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीत सहज विजयाची नोंद केली. भारताने उपांत्य फेरीत जपानचा ६-१ ने पराभव केला, तर अंतिम फेरीत पाकवर ६-२ ने सहज विजय मिळविला. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीतने १० व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित भारताला खाते उघडून दिले. हरमनप्रीतने १५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरदुसरा गोल केला. पाकिस्तानने पुनरागमनाचा प्रयत्न केला. २८ व्या मिनिटाला याकूबने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत पाकचे खाते उघडले. हरमनप्रीतने ३० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित हॅट््ट्रिक केली. मध्यंतरापर्यंत भारताने ३-१ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये अरमान कुरेशीने मैदानी गोल नोंदवित भारताला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. मनप्रीत (ज्युनिअर) याने ५० व्या मिनिटाला भारतातर्फे पाचवा गोल नोंदवला, तर हरमनप्रीतने ५३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर वैयक्तिक चौथा तर भारताचा सहावा गोल केला. पाकिस्तानतर्फे ६८ व्या मिनिटाला दिलबर मोहम्मदने केलेला गोल पराभवातील अंतर कमी करणारा ठरला. (वृत्तसंस्था)ज्युनिअर जिंकले, पण सीनिअर हरलेरायपूर : भारताच्या ज्युनिअर संघाने मलेशियामध्ये परंपरागत पाकिस्तान संघाचा पराभव करीत तिसऱ्यांदा आशिया कप पटकावण्याचा पराक्रम केला, तर मायदेशात सीनिअर संघाला मात्र विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलिया विरुद्ध रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान राजनांदगावमध्ये पहिला कसोटी सामना २-२ ने अनिर्णीत संपला होता. रायपूरमध्ये नवनिर्मित सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सुरुवातीला यजमान भारतीय संघाने आघाडी घेतली होती, पण आॅस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करताना या लढतीत २-१ ने बाजी मारली. या विजयासाह तीन सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने या लढतीत पहिल्या दोन क्वार्टरमध्ये शानदार कामगिरी केली. मात्र त्यानंतर आॅस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. भारताने गोल करण्याच्या काही संधी गमावल्या. भारतीय गोलकीपर पी. आर. श्रीजेशने काही अप्रतिम बचाव केले. भारताने तिसऱ्यांदा या स्पर्धेत जेतेपद पटकावताना पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी साधली. भारताने यापूर्वी २००४ व २००८ मध्ये ज्युनिअर आशियाई हॉकी स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला होता.भारताची अंतिम लढतीत पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्यांदा गाठ पडली. १९९६ मध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता, तर २००४ मध्ये भारताने सरशी साधली होती.आता पुन्हा एकदा भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली.
पाकला हरवून भारत चॅम्पियन
By admin | Updated: November 23, 2015 00:35 IST