कुआनतन : भारताने आक्रमक कामगिरी कायम राखताना पहिल्या उपांत्य लढतीत शनिवारी जपानाचा ६-१ ने धुव्वा उडवला आणि ज्युनिअर आशिया कप हॉकी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारताची लढत आता पाकिस्तानशी होणार असून त्यांनी कोरियाला हरवून अंतिम फेरी गाठली आहे.भारताने संघाने साखळी फेरीतील तीनही सामने जिंंकल्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत सहज विजयाची नोंद करीत अंतिम फेरीत धडक मारली. भारताने साखळी फेरीत जपानचा २-१ ने पराभव केला होता. शनिवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताने एकतर्फी विजय मिळवला. मध्यंतरापर्यंत भारतीय संघ ४-० ने आघाडीवर होता. हरमनप्रीतने दोन गोल नोंदवीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने सामन्याच्या १२ व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. मनदीपने १२ व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवला. मनप्रीत ज्युनिअरने १३ व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवीत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीतने २३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर चेंडूला गोलजाळ्यात धाडून भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. विक्रमजित सिंगने २७ व्या मिनिटाला भारतातर्फे चौथा गोल नोंदवला. मध्यंतरानंतर ४४ व्या मिनिटाला जपानाला एक संधी मिळाली. त्यावर जपानतर्फे एकमेव गोल यामादा शोताने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवला. हरमनप्रीतने ४८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर वैयक्तिक दुसरा तर भारतातर्फे पाचवा गोल नोंदवला. वरुण कुमारने ६४ व्या मिनिटाला सहावा गोल नोंदविला. साखळी फेरीतील लढतीत जपानने संघर्षपूर्ण खेळ केला होता, पण उपांत्य फेरीत मात्र त्याचा अभाव दिसला. (वृत्तसंस्था)
भारताची अंतिम फेरीत धडक
By admin | Updated: November 22, 2015 04:00 IST