वसीम अक्रम लिहितो़...रवी शास्त्री यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी मिळायलाच हवी. या संदर्भात शास्त्रींचे वक्तव्य सहजरीत्या सकारात्मक घेतले जावे. क्षमतेनुरूप खेळण्यासाठी घरच्या खेळपट्टीचा लाभ यजमान संघाला मिळायलाच हवा. तथापि, खेळपट्टी ही खूप वळण घेणारी नसावी. ती थोडी टणक आणि फिरकीला अनुकूल असावी. मी मुंबईसारख्या ‘पाटा’ खेळपट्टीबाबत बोलणार नाही. तेथे आफ्रिकेने ४०० पेक्षा अधिक धावा ठोकल्या. जेव्हा घरच्या मैदानावर खेळतो, तेव्हा यजमान संघाची मागणी समजण्यासारखीच असते. शास्त्री संघाचे संचालक असल्याने त्यांची मागणी यथोचित आहेच. मनाप्रमाणे खेळपट्टी मागितल्याबद्दल शास्त्रीवर टीका झाली, हे मला माहिती आहे. जेव्हा आम्ही द. आफ्रिका किंवा आॅस्ट्रेलियाचा दौरा करतो, तेव्हा हिरव्यागार खेळपट्ट्या मिळतात. तेथे चेंडू फार कमी वळण घेतात. मग घरच्या मैदानावर आम्हाला आमच्या मनाप्रमाणे का नको? शास्त्री यांनी यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी मागताच ‘हाय तोबा’ सुरू झाले आहे.वन डे मालिकेत भारताला आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेट हा वेगळाच प्रकार आहे. अखेरच्या वन डेचा अपवाद वगळता उर्वरित चारही सामन्यांत भारत चांंगलाच खेळला. सामान्यपणे मोहालीच्या खेळपट्टीवर गवत असते. यामुळे चेंडू चौथ्या आणि पाचव्या दिवशी ‘टर्न’ होतो. माझ्या मते ही आदर्श खेळपट्टी असेल.द. आफ्रिका बलाढ्य संघ आहे. या संघाकडे ताशी १४० किमी वेगाने गोलंदाजी करणारे खेळाडू आहेत. या गोलंदाजांपुढे भारतीयांची खरी परीक्षा असेल. हे पाहता, उमेश यादव तसेच वरुण अॅरोन यांनी योग्य लय आणि वेग राखून मारा करायला हवा. असे घडल्यास आफ्रिकेच्या फलंदाजांवर जरब बसविणे सोपे होईल. ईशांतचे निलंबन भारतीय गोलंदाजी माऱ्याला धक्का बसण्यासारखे आहे. आश्विनने पूर्णपणे फिट झाल्यानंतरच मैदानात यावे, असा त्याला माझा मोलाचा सल्ला असेल. विराटसाठी कर्णधार या नात्याने ही मालिका अत्यधिक महत्त्वाची ठरावी. (टीसीएम)
यजमानांना पूरक खेळपट्टी हवीच!
By admin | Updated: November 5, 2015 02:28 IST