विश्वास चरणकर, कोल्हापूर - जागतिक क्रिकेटचा अविभाज्य घटक बनू पाहणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) दरवर्षी वेगवेगळ्या विक्रमाने गाजत आहे. यंदाही या स्पर्धेने अनेक विक्रम घडविले, अनेकांना ओळख मिळवून दिली. गेल्या सहा वर्षांत तब्बल २८ शतके झाली, यंदाच्या आयपीएलमध्ये साखळी फेरीच्या ५६ सामन्यांत केवळ एकच शतक झाले आहे. मोहालीत पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सलामीवीर लेंडेल सिमॉन्स याने हे एकमेव शतक झळकावले आहे. मॅक्सवेल, कोरी अँडरसन, वॉर्नर, डिव्हीलियर्स हे शतकाजवळ पोहोचूनही कमनशिबी ठरले, तर सिमॉन्स मात्र लकी ठरला. २००८ साली ‘आयपीएल’ला सुरुवात झाली. स्पर्धेचा पहिला सामना १८ एप्रिल रोजी कोलकता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघादरम्यान खेळविला गेला. या सामन्यात कोलकता नाईट रायडर्सकडून ब्रँडन मॅक्युलमने ७३ चेंडूंत १५८ धावांची झंझावाती खेळी केली. खरं तर लीग हा प्रकार भारतीयांसाठी तसा नवीन होता. निर्जीव वस्तूंसारखा खेळाडूंचाच कसा काय लिलाव होणार, याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. त्यात प्रत्यक्ष लिलावाच्यावेळी खेळाडूंना मिळालेला कोट्यवधींचा पैसा पाहून अनेकांचे डोके गरगरले होते. त्यामुळे ‘आयपीएल’बद्दल एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली होती. त्यातच स्पर्धेच्या पहिल्यावहिल्या सामन्यात मॅक्युलमच्या झंझावाती शतकाने ‘आयपीएल’च्या लोकप्रियतेचा पाया रचला गेला. यानंतर आजतागायत या स्पर्धेत तब्बल २८ शतके ठोकली गेली आहेत. या शतकवीरांच्या यादीत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते एका सिझनमध्ये उदयास आलेला पॉल वल्थाटी (राजस्थान रॉयल्स) या नावांचा समावेश आहे. २००८चे पहिले सत्र सहा शतकांनी सजले; पण यात एकही भारतीय खेळाडू नव्हता. पुढच्या म्हणजे २००९ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दुसर्या स्पर्धेत दोनच शतके पाहायला मिळाली. ‘आरसीबी’चा मनीष पांडे (११४) हा ‘आयपीएल’मधील पहिला भारतीय शतकवीर ठरला. २०१० साली पुन्हा शतकांची संख्या चारपर्यंत वाढली. या चारमध्ये चेन्नईचा मुरली विजय (१२७) आणि आरसीबीचा युसूफ पठाण (१००) हे दोघे भारतीय होते.
सामने ५६; शतक केवळ एकच
By admin | Updated: May 27, 2014 06:17 IST