मुंबई : मधल्या फळीतील फलंदाज करुण नायरने झळकावलेल्या जबरदस्त त्रिशतकाच्या जोरावर कर्नाटकने तब्बल ४८४ धावांची आघाडी घेतली. नायरच्या जोरावर गतविजेत्या कर्नाटकने रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण राखताना तामिळनाडूच्या आशा जवळजवळ संपुष्टात आणल्या. लोकेश राहुलने ३२० चेंडंूत १८८ धावा चोपल्या. अवघ्या १२ धावांनी त्याचे द्विशतक हुकले. तिसऱ्या दिवसअखेर कर्नाटकने ७ बाद ६१८ धावा केल्या. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात नायरने ५३३ चेंडूंचा सामना करताना तब्बल ४५ चौकार व उत्तुंग षटकार खेचून नाबाद ३१० धावा फटकावल्या. ५ बाद ३२३ या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करताना लोकेश-नायर या नाबाद जोडीने आणखी १४७ धावांची भर घातली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३८६ धावांची भागीदारी करताना तामिळनाडूच्या हातून सामना जवळजवळ हिसकावून घेतला.रंगराजनने १३७व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर लोकेशला झेलबाद करून तामिळनाडूला मोठे यश मिळवून दिले. या वेळी तामिळनाडू कर्नाटकला झटपट गुंडाळणार असे वाटू लागले. मात्र दुसऱ्या बाजूला खंबीरपणे उभ्या असलेल्या नायरच्या मनात वेगळेच होते. लोकेश बाद झाल्याचा कोणताही परिणाम आपल्या खेळीवर होऊ न देता त्याने संघाची धावसंख्या वाढवली. लोकेश-नायर यांनी तिसऱ्या दिवशी ३७.२ षटके फलंदाजी करताना तामिळनाडूचा घाम गाळला.दरम्यान, दिवसभरात फक्त दोन फलंदाज बाद करण्यात यश आलेल्या तामिळनाडूकडून रंगराजन आणि क्रिस्ट यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्नाटक विजेतेपदाच्या मार्गावर
By admin | Updated: March 11, 2015 03:37 IST