नवी दिल्ली : नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)देखील २०१४-१५च्या सुरू वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही बदल केले आहेत. यंदा हे बदल एकदिवसीय व टी-२० क्रिकेटमध्ये महिला, पुरुष आणि ज्युनियर स्तरावर लागू होतील. हे बदल आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांकडे पाहून करण्यात आल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने आॅक्टोबर २०१५ ते मार्च २०१६ पर्यंतच्या सुमारे ९०० विविध सामन्यांत बदल केले आहेत. पुढील वर्षी भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या विश्वचषक टी-२० क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहेत. यानुसार विजय हजारे ट्रॉफी आणि टी-२० सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धांचा बदल करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये सामावेश आहे. ५० वर्षे जुनी दुलीप ट्रॉफी ही स्पर्धा बंद करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्यानुसार रणजी स्पर्धेप्रमाणे या दोन्ही स्पर्धा आता विभागीय पद्धतीऐवजी गटनिहाय पद्धतीने खेळविण्यात येतील. त्याचबरोबर देवधर ट्रॉफी स्पर्धेतदेखील बदल करण्यात आला असून, यामध्ये २०१४-१५च्या विजय हजारे ट्रॉफीतील दोन विजयी संघ व सिनियर राष्ट्रीय निवड समितीद्वारे निवडलेला संघ, अशा एकूण ३ संघांमध्ये ही स्पर्धा खेळविण्यात येईल. बीसीसीआयने दोन नवीन महिला स्पर्धा खेळविण्याचा निर्णय घेतला असून, त्यांमध्ये आंतरराज्य आणि आंतरविभागीय स्तरावर २३ वर्षांखालील एकदिवसीय सामने खेळवले जातील. यानंतर सिनियर खेळाडूंमध्ये तीन दिवसीय सामने खेळविण्यात येतील. ज्युनियर खेळाडूंसाठी १९ वर्षांखालील चॅलेंजर ट्रॉफीदेखील खेळविण्यात येणार असून, त्यामध्ये तीन संघांचा समावेश असेल. जानेवारी महिन्यात बांगलादेश येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून राष्ट्रीय संघ निवडीसाठी ही स्पर्धा होईल. (वृत्तसंस्था)
देशांतर्गत एकदिवसीय व टी-२० क्रिकेटमध्ये बदल
By admin | Updated: July 21, 2015 00:39 IST