ऑनलाइन लोकमत
ब्रिस्बेन, दि. १७ - मुरली विजयच्या शानदार शतकाच्या(१४४) जोरावर भारताने दिवसाअखेर ४ गडी गमावत ३११ धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाचे तीन गडी पटापट धवन (२४), पुजारा (१८) व कोहली (१९) पटापट तंबूत परतल्याने भारताची अवस्था बिकट झाली होती मात्र मुरली विजयने (१४४) भारताचा डाव सावरला. मात्र लियॉनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने सुटकेचा नि:श्वास टाकला. सध्या अजिंक्य रहाणे (नाबाद ७५) व रोहित शर्मा (२६) खेळत उद्या कसोटीच्या दुस-या दिवशी खेळपट्टीवर टिकून राहून मोठी धावसंख्या उभारायची जबाबादीर त्यांच्यावर आहे. ऑस्ट्रेलियातर्फे हेजलवूडने २ तर लियॉन व मार्शने १ बळी टिपला.
अॅडलेडवरील पहिल्या कसोटीत भारत अवघ्या ४८ धावांनी पराभूत झाला आणि ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली. मात्र, यशस्वी आणि अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी परतल्यामुळे संघात नवचैतन्य आलेआहे. तर मायकेल क्लार्कच्या दुखापतीमुळे तरूण स्टिव्ह स्मिथ याच्याकडे आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया संघ कर्णधारासह काही नव्या बदलांनी सामन्यात उतरला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने दुस-या कसोटीसाठी संघात जोश, हेजलवूड आणि मिशेल स्टार्क यांना स्थान दिले आहे. रियान हॅरिस व पिटर सिडल यांना विश्रांती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त क्लार्कच्या जागी संघात शॉन मार्शचे आगमन झाले आहे.