ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारताचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद होत असताना, मुंबईकर अजिंक्य रहाणेने मात्र दुस-या टोकाकडून शांतता, संयमाने फलंदाजी करत अर्धशतक झळकवले आहे. रहाणेचे हे भारतातील पहिले अर्धशतक आहे. रहाणे (५५), रविंद्र जाडेजा (१३) ही जोडी मैदानावर असून, भारताने १७५ धावांचा टप्पा पार केला आहे.
चौथी कसोटी जिंकून मालिकेत ३-० असा मोठा विजय मिळवण्याचे स्वप्न पाहणा-या भारताचा डाव अडचणीत सापडला आहे. भारताचे सहा गडी तंबूत परतले आहेत. संघाचे आघाडीचे सहा फलंदाज बाद झाल्याने भारताला चांगलाच धक्का बसला आहे.
उपहारापर्यंत अवघी १ विकेट गमवून सुस्थितीत असलेला भारताचा डाव नंतर अडचणीत सापडला. उपहारानंतर खेळ सुरु होताच भारताला लागोपाठ दोन धक्के बसले. डेन पीएटने शिखर धवनला (३३) तर अॅबोटने चेतेश्वर पूजाराचा (१४) त्रिफळा उडवला. त्या आधी डेन पीएटने धवनला पायचीत केले. त्याआधी त्याने विजयला (१२) धावांवर आमलाकरवी झेलबाद केले.
भारताला मालिकेत २-० अशी आघाडी मिळाली असल्याने हा सामना जिंकून ३-० अशा मोठ्या विजयासोबतच आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेण्याचा भारताचा इरादा आहे.
तत्पूर्वी सामान सुरू होण्यापूर्वी फिरोजशहा कोटला मैदानावर नुकताच निवृत्त झालेला भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा बीसीसीआयतर्फे सत्कार करण्यात आला.