सिडनी : ‘मंकीगेट’ प्रकरणातील वादाची मालिका अद्याप संपलेली नाही. क्रिकेट आॅस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूला खाली पाहायला लावण्यापेक्षा भारताचा खोटारडेपणा उघड पाडणे आवश्यक होते, असे आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डरने व्यक्त केले आहे. ‘क्रिकेट एस आय सी इट’ या पुस्तकामध्ये १९८७ च्या विश्वविजेत्या संघाचा कर्णधार बॉर्डरने हरभजन सिंग आणि अॅण्ड्य्रू सायमन्ड्स यांच्यादरम्यान घडलेल्या प्रकरणावर आपली बाजू मांडली. २००७-०८ च्या वादग्रस्त आॅस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने हरभजनवर लावलेली तीन सामन्यांची बंदी रद्द करण्यात आली नाही तर दौरा सोडण्याची धमकी दिली होती. बॉर्डरने पुस्तकात लिहिले आहे की, ‘त्यावेळी माझा क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या बोर्डामध्ये समावेश होता. आम्ही आयसीसीच्या अपीलची चौकशी आणि निकाल स्वीकारला होता, पण मला तसे कधीच वाटले नाही. आम्ही सायमन्ड्सला एकटे सोडले. या कृतीला माझा विरोध होता.’बॉर्डर म्हणतो, ‘बोर्डाचे म्हणणे होते की, आम्ही भारताला दौरा सोडून जाऊ देऊ शकत नाही, पण नैतिकतेचा विचार केला तर भारताचा खोटारडेपणा उघड करणे आवश्यक होते.’ (वृत्तसंस्था)
पुन्हा ‘मंकीगेट’चे भूत
By admin | Updated: November 9, 2014 23:22 IST