नवी मुंबई - महानगरपालिकेच्या ६६८ पदांसाठी ८४ हजार ७७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील पात्र उमेदवारांची लवकरच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षा राज्यातील विविध जिल्ह्यात घेतल्या जाणार आहेत. परीक्षा निर्विघ्न, सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, यादृष्टीने परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून प्रत्येक केंद्रांवर पोलिस बंदोबस्त देण्याची विनंती केली. परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
भरती प्रक्रियेदरम्यान काही समाजकंटक उमेदवारांना खोटी आश्वासने देऊन आर्थिक फसवणूक करण्याचा धोका संभवतो. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार लेखी परीक्षा पारदर्शक, शांततेत पार पडावी, यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची विनंती करून त्यासाठीचा खर्च पालिकेकडून दिला जाणार आहे. भरतीप्रक्रियेबाबत राज्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यांमध्ये फसवणुकीसंबंधी तक्रार प्राप्त झाल्यास ती नोंदवून योग्य कारवाई करावी, असेही पत्रात स्पष्ट केले आहे.
समाजमाध्यमावर माहिती भरती प्रक्रियेबाबत दिशाभूल करणाऱ्या अफवांपासून उमेदवारांनी सावध राहावे, तसेच भरतीसंदर्भातील अधिकृत आणि अचूक माहितीसाठी नवी मुंबई पालिकेच्या अधिकृत वेबसाइट तसेच फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम पेजला भेट देण्याचे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
परीक्षेची तारीख लवकरचया भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हानिहाय केंद्रांची यादी, परीक्षा दिनांक, वेळ व आवश्यक मनुष्यबळाबाबत लवकरच कळविण्यात येईल, असे आयुक्तांनी नमूद केले आहे.
संवर्गातील ६६८ पदांची भरतीमहानगरपालिकेच्या या भरती प्रक्रियेत ३० संवर्गातील ६६८ पदांचा समावेश आहे. यामध्ये लिपिक टंकलेखक (१३५), स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (१३१), लेखा लिपिक (५८), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (५१), एएनएम (३८), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (३५), वॉर्डबॉय (२९), कक्ष सेविका/आया (२८), शस्त्रक्रियागृह सहायक (१५), आरोग्य सहायक महिला (१२), औषध निर्माता (१२), वैद्यकीय समाजसेवक (१५) आदी पदांचा समावेश आहे.