मुंबई : समाजाचा विकास साधायचा असेल तर आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात महिलांना मोकळीक मिळणे गरजेचे असून, त्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या शुक्रवारी पार पडलेल्या ६४व्या दीक्षान्त समारंभादरम्यान सुरेश प्रभू बोलत होते. या वेळी राज्यपाल विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे, कुलगुरू डॉ. वसुधा कामत आणि किशोरी आमोणकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुरेश प्रभू म्हणाले, लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवायचे असेल तर आरक्षणाची आवश्यकता आहे. महिलांना राजकारण आणि आर्थिक अशा दोन्ही क्षेत्रांत स्वातंत्र्य दिले पाहिजे. समाजातल्या सर्वच क्षेत्रांत महिलांचा सहभाग कसा वाढेल याबाबत विचार करण्याची गरज आहे.किशोरी आमोणकर यांना या वेळी संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल विद्यासागर राव यांच्या हस्ते डी.लिट पदवी प्रदान करत सन्मानित करण्यात आले. समारंभादरम्यान पीएच.डी., एमफिल, मास्टर्स करणाऱ्या १५ हजार ६०० विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान केल्या. तसेच ७० पीएच.डी. आणि १२ एम.फिल पदव्या प्रदान केल्या. (प्रतिनिधी)
महिला सक्षमीकरण गरजेचे - सुरेश प्रभू
By admin | Updated: January 10, 2015 01:57 IST