पालघर : दिवाळीसाठी घर, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तु, कपडे, मिठाई इ. च्या खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षीत करण्याच्या दृष्टीने बाजारपेठा हळुहळू सजु लागल्या असल्या तरी रोजगारासाठी आदिवासींचे स्थलांतर, भाववाढीने त्रस्त जनता, बाजारपेठेवरील मंदीचे सावट यामुळे सर्वत्र खरेदी विक्रीच्या सर्वच व्यवहाराला हुडहूडीने ग्रासले आहे. दिवाळीच्या झगमगाटीच्या वातावरणात सर्वसामान्यांच्या उत्साह व आनंदावर त्यामुळे विरजण पडण्याची चिन्हे आहेत.दिवाळी हा सण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा होतो. त्यासाठी आपल्या आर्थिक कुवतीनुसार बेत आखले जात असतात. पालघर जिल्ह्णातील आठही तालुक्यातील बाजारपेठा, आकाशकंदील, लायटींग, फराळाचे साहित्य, कपडे, सोने खरेदीसाठी सजल्या आहेत.पालघर जिल्ह्णात भात हे प्रमुख पीक असून पावसाच्या लहरी वातावरणामुळे दुष्काळजन्य परिस्थिती नसली तरी शंभर टक्के पीक हातात लागेल याची पुर्ण शाश्वती नसल्याचे चित्र आहे. आजही अधुनमधून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्रूाने लहरी वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील भाताचे पीक पडून आहे. दिवाळी तोंडवर आल्याने हातात पैसे नसल्याने विक्रमगड, जव्हार, मोखाडा इ. भागातील शेकडो कुटूंबे रोजगारासाठी शहरामध्ये दाखल झाली आहेत. जिल्ह्णात वसईपासून ते डहाणूच्या झाई-बोर्डीच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मच्छीमार राहत असून ३ ते ४ हजार लहान मोठ्या नौकाद्वारे मासेमारी केली जात आहे. या व्यवसायामध्ये सुमारे ६० ते ७० हजार कामगार व त्यांच्या कुटूंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबुन आहे. परंतु मत्स्य उत्पादनात मोठी घट होत असल्याने तसेच पर्ससीन नेटधारक, ट्रॉलर्स या महाकाय नौकाद्वारे अपरीमीत मासेमारी होत असल्याने किनारपट्टीवरील पारंपारीक छोटा मच्छीमारास पुरेसे मासे मिळत नसल्याने तो कर्जबाजारी बनला आहे. त्यातच इंधन, बर्फ, साहित्य इ. मोठी भाववाढ झाल्याने उत्पादन व खर्चाचा मेळ बसत नसल्याने अनेक नौका किनाऱ्यावर पडून आहेत.एकंदरीत पाहत भाववाढ, महागाईच्या गर्तेत हा सण सापडला असला तरी दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने काही प्रमाणात खरेदीला मर्यादा आणून त्या दृष्टीने हा सण साजरा करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रश्न करणार असल्याचे अदिती चव्हाण या महिलेने सांगितले. तर बाजारपेठेत सध्या मंदी असली तरी काही दिवसात खरेदीला वेग येईल अशी आशा प्रकाश स्टोर्सच्या मालकाने सांगितले. (वार्ताहर)तारापूर औद्योगिक वसाहत, बिडको वसाहत, जेनेसीस, शक्ती उद्योग औद्योगिक वसाहत पालघर, तलासरी, वाडा, मनोर, वालीव इ. भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखाने असून लाखो स्थानिक व परराज्यातील कामगार या कारखान्यात काम करतात. परंतु बाजारपेठेत मंदीचे वातावरण असल्याने उत्पादनाला मागणी नाही. त्यामुळे येथेही काही प्रमाणात मंदीचे सावट आहे. या कारखान्यामध्ये राजकीय व धनदांडग्यांचे कंत्राटपद्धतीने कामगार पुरविण्याचे ठेके असल्याने कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते. त्यातच दिवाळीच्या सणात हक्काचा मिळणारा बोनसही हद्दपार झाल्याने हाती पडत असलेल्या तुटपूंज्या पगारावर यावर्षी दिवाळी साजरी करण्याची वेळ कामगार वर्गावर आली आहे.
ऋण काढून होणार सण साजरा?
By admin | Updated: October 30, 2015 23:38 IST