नवी मुंबई : मतदार यादीमधील भोंगळ कारभाराचा फटका राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या परिवाराला गुरुवारी बसला. दोन केंद्रे फिरूनही त्यांच्यासह परिवाराचे नाव यादीत मिळत नव्हते. अखेर एक तासाच्या धावपळीनंतर त्यांचे मतदान पूर्ण झाले. या गोंधळामुळे नाईक यांनी निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर गंभीर आरोप केले. आयोगाची यंत्रणा 'टू द पॉइंट' काम करत नसून, याबाबत तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.
नाईक परिवाराचे नाव यापूर्वी रा. फ. नाईक विद्यालयातील केंद्रावर होते. मात्र, काही काळापासून ते महापालिकेच्या शाळा क्रमांक २५ सीबीएसई शाळेच्या केंद्रावर होते. यामुळे ते तिथे गेले असता, कोणाचेही नाव दिसून आले नाही. त्यांचे नाव सेंट मेरी शाळेत असल्याचे त्यांना सांगितले. तिथेही त्यांना खूप वेळ शोधाशोध करावी लागली. तासभरानंतर त्यांचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर गणेश नाईक यांनी सांगितले, निवडणूक आयोगाचे अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत. आयोगाने आधी प्रभाग रचना करताना ती नवी मुंबईत चुकीची आणि विशिष्ट पक्षाला पूरक ठरेल, अशी केल्याचा आरोप त्यांनी केला.
सकाळी साडेसातपासून या केंद्रावरून त्या केंद्रावर
गणेश नाईक आणि परिवाराच्या मतदानाचा घोळ सकाळी ७:३० वाजतापासून सुरू होता. त्यानंतर कोपरखैरणे येथील सेंट मेरी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर गणेश नाईक, संजीव नाईक, सून कल्पना नाईक यांचे नाव मिळाले. तर, त्यांचे पुतणे माजी महापौर सागर नाईक आणि त्यांची पत्नीचे नाव परिवारासह न येता वेगवेगळ्या ठिकाणी होते.