नवी मुंबई : उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत अडकला आहे. तीन हजार कोटी प्रत्येक वर्षी खड्यात घातले जात होते. आम्ही आता त्यांचा धंदा बंद केला आहे. आम्ही रस्ते धुतले त्यांनी मुंबईची तिजोरी धुतली अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली.
नवी मुंबईमधील उद्धव सेना, काँग्रेस व शरद पवार गटाच्या १३ नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. राजा का बेटा राजा नही बनेगा जो मेहनत करेगा वही राजा बनेगा. शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे सर्व जण आपले सवंगडी आहेत. उबाठा सवंगड्यांना घरगडी समजत होते. महानगरपालिकांमध्येही युतीचा भगवा फडकेल. राज्यात सर्वत्र पक्षामध्ये प्रवेश करणारांची रीघ लागली आहे.मुंबईमध्ये आतापर्यंत ६५ जणांनी प्रवेश केला आहे. उबाठाने स्वार्थासाठी विचारांशी फारकत घेतली. फक्त आरोप करण्याशिवाय ते काहीच करत नाहीत. विधानसभेला आरोपांचा किस पाडून फक्त २० जागा जिंकल्या. आपण ६० जागा जिंकल्याचे त्यांनी सांगितले.नवी मुंबईमधील माथाडीसह एलआयजी घरांवर कारवाई होऊ दिली जाणार नाही. कंडोनियम अंतर्गत कामांसाठी विशेष निधी दिला जाईल. कार्यकर्त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहणार आहे. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहनही शिंदे यांनी केले. यावेळी आमदार शरद सोनावणे, उपनेते विजय नाहटा, विजय चौगुले, खासदार नरेश म्हस्के, जिल्हा प्रमुख किशोर पाटक, द्वारकानाथ भोईर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.दहशतवादी हल्याचा निषेधकाश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमीत शहा या हल्याला जशास तसे उत्तर देतील. देशवासीयांच्या मनात पाकिस्तानविषयी चीड निर्माण झाली असून भारतीय जवान चोख उत्तर देतील अशी भुमीका एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.