- वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघर ते पनवेल महामार्गावरून प्रवास करताना एरवी १५ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, सध्या रस्त्यावरील खड्डे, साचलेले पाणी यामुळे हा प्रवास सुमारे दोन तासांवर गेला आहे. देशातील व्यस्त महामार्गापैकी सायन-पनवेल महामार्ग ओळखला जातो. त्यामुळे या मार्गावर मोठी वर्दळ असते. पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. सायन-पनवेल महामार्गावर टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून अवजड वाहनासाठी टोल वसूल करण्यात येतो. मात्र, त्या तुलनेने रस्त्याची देखरेख होत नाही. रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. मोठमोठे खड्डे चुकवण्याच्या नादात वाहने एकमेकांवर धडकण्याचे प्रकार वाढले आहेत. हिरानंदानी ते कोपरा पुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. पिकअवर्समध्ये ही परिस्थिती आणखीनच गंभीर होते. टोल प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखवले जात आहे. मान्सूनपूर्व या ठिकाणी कंत्राटदाराने कोणत्याही प्रकारची कामे केली नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांकडून कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने कंत्राटदारांना भय राहिले नसल्याची प्रतिक्रिया या मार्गावरून दररोज प्रवास करणारे अमित रणदिवे यांनी दिली. कामोठे येथे एका मार्गिकेचे काम रखडल्याने वाहनांना कामोठेत प्रवेश करण्यासाठी कळंबोली उड्डाणपुलाखालून वळसा घालून यावे लागते. त्यानंतर पुढे जाताना कळंबोली सर्कलजवळ चारही बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे मोठी कोंडी होते. पावसाळ्यातील रस्त्यांची होणारी दुरवस्था पाहता, सार्वजनिक बांधकाम खाते व टोल प्रशासन दोघांशी पत्रव्यवहार केले होते. मात्र, तरीही दखल घेतली गेलेली नाही. या मार्गावर होणारी वाहतूककोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. - प्रवीण पांडे, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
खारघर-पनवेल प्रवासासाठी दोन तास
By admin | Updated: July 16, 2017 02:48 IST