अरुणकुमार मेहत्रे/लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महानगरपालिका निकाल लागून जवळपास आठ दिवस होत आले, तरीही उमेदवार निवडणुकीच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. सध्या अनेक ठिकाणी बॅनर, फलक लावून मतदारांचे आभार मानले जात आहेत. त्यामध्ये जिंकलेल्यांबरोबर पराभूत उमेदवारसुद्धा मागे राहिलेले नाहीत. कळंबोली वसाहतीत चौकाचौकांत हे बॅनर लावण्यात आले आहेत.महानगरपालिकेचा निकाल २६ मे रोजी जाहीर झालेला आहे. भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. त्याचबरोबर शेतकरी कामगार, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. समाविष्ठ गाव आणि कळंबोलीतील तीन प्रभागांत आघाडीला बऱ्यापैकी जागा मिळालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कळंबोलीत प्रभाग-आठचे विजयी उमेदवार सतीश पाटील, बबन मुकादम यांनी करवली चौकात मतदारांचे आभार व्यक्त करणारे बॅनर लावले आहेत. त्याच ठिकाणी प्रभाग-दहामधून निवडून आलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय खानावकर यांनीसुद्धा बॅनरद्वारे मतदारांचे आभार व्यक्त केले आहेत. नगरसेविका कमल कदम यांचेही फलक येथे झळकत आहेत. प्रभाग क्र मांक-नऊमधून पराभूत झालेल्या शिवसेनेच्या उमेदवार भारती विश्वास पेटकर यांनी धनुष्यबाणाला मतदान करणाऱ्यांचे ऋण व्यक्त करणारे बॅनर चौकात लावले आहेत. सुधागड शाळेच्या जवळ शिवसेनेच्या उज्ज्वला म्हसकर यांनी मतदारराजाचे आभार मानणारे फलक लावले आहेत. ‘लढता लढता हरले जरी, हरल्याची मुळीच खंत नाही,’ अशा आशयाचा फलक सरस्वती काथारा यांनी लावला आहे. कामोठे वसाहतीत सेक्टर-२० येथे बॅनर लावून ललिता पाटील, उषा शितोळे, शंकर म्हात्रे, माया आहिरे यांनी आभार प्रदर्शन केले आहे. नगरसेविका हेमलता गोवारी, शीला भगत यांच्यासह रवींद्र जोशी, अर्जुन डांगे यांनीही सेक्टर-१७मध्ये फलक लावून मतदारांचे आभार मानले आहेत. सेक्टर-३६मध्ये शिवसेनेचे गोरखनाथ आहेर यांनीही मतदारांचे आभार व्यक्त केले आहेत.वाढदिवसाचेही बॅनरच बॅनर, १ जून रोजी अनेकांचे वाढदिवस असल्याने सिडको वसाहतीत विशेष करून कळंबोलीत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. त्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी अभीष्टचिंतनाचे बॅनर अनेक ठिकाणी लावून, अनेकांनी आपल्या पराभवावर जणूकाही पांघरूण घालण्याचा प्रयत्न केल्याचे बॅनरबाजीवरून दिसून आले.
चौकाचौकांत मतदारांचे आभार प्रदर्शन
By admin | Updated: June 2, 2017 06:02 IST