अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : दहशतवादी हल्ल्यात कामोठेचे सुबोध पाटील यांच्या मानेला गोळी चाटून गेल्याने जखमी झाले. त्यांच्या पत्नी माणिक पाटील या सुखरुप आहेत. मात्र, श्रीनगर येथील मदत कक्षाकडून पुरेशी माहिती मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सुबोध पाटील यांना श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. पाटील हे कस्टममधून सेवानिवृत्त झाले आहेत. हल्ल्याची बातमी कळताच अनेकांनी पाटील यांच्या घराकडे धाव घेतली होती.
३९ पर्यटकांनी केले होते अमरनाथ यात्रेसाठी बुकिंग कामोठे सेक्टर २१ येथील राॅयल हाइट्स सोसायटीतील रहिवासी सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक पाटील यांनी अमरनाथ यात्रेसाठी पनवेलमधून निसर्ग ट्रॅव्हल्सद्वारे बुकिंग केले होते. त्यांच्या सोबत खारघर, पनवेल, तेलीपाडा मुळेखंड, उरण, येथील एकूण ३९ पर्यटकांनी बुकिंग केले होती. २१ ते ३० एप्रिलदरम्यान निसर्ग ट्रॅव्हल्सकडून अमरनाथ यात्रेसाठी नियोजन केले होते.
श्रीनगर येथील मदत कक्षावर रहिवाशांची नाराजी काश्मीर पहलगाम येथील हल्ल्याची बातमी कळल्यानंतर सुबोध पाटील यांच्या सोसायटीतील रहिवाशांनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या श्रीनगर येथील मदत कक्षाला फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मदत सेंटरकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. मदत कक्षातून पाटील यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे, एवढेच सांगितले जात आहे.
पहलगाम येथील हल्ल्यासंदर्भात आईशी बोलणे झाले. मात्र, वडिलांशी काही बोलणे झाले नाही. वडील रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यांची प्रकृती चांगली असून, आई सुखरुप आहे. - प्राची शामा, सुबोध पाटील यांची मुलगी