नवी मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या जोरावर स्मार्ट सिटी स्पर्धेसाठीचा प्रस्ताव फेटाळला. देशात पहिला क्रमांक मिळविण्याची शक्यता असताना सत्ताधाऱ्यांच्या मनमानीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. शिवसेना - भाजपाने वाशीत मोर्चा काढून याचा निषेध केला असून, १८ डिसेंबरला नवी मुंबई बंदचे आयोजन केले आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये नवी मुंबईचा सहभाग झालाच पाहिजे यासाठी शिवसेना व भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या मनमानीचा निषेध करण्यासाठी वाशीतील शिवाजी चौकात विद्यार्थ्यांचा निषेध मोर्चा काढण्यात आला. चार महिने प्रत्येक शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. साडेतीन लाख विद्यार्थी व नागरिकांनी पालिकेकडे स्मार्ट सिटीविषयी संकल्पना पाठविल्या होत्या. चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या संकल्पना कागदावर उतरविल्या होत्या. परंतु राष्ट्रवादी काँगे्रसने या प्रस्तावास विरोध केल्यामुळे या विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. एनसीपीवाले काका आम्हाला का फसवलेत अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटीचा आग्रह धरला. शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली. शिवसेनेचे उपनेते व पालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा यांनीही सत्ताधाऱ्यांना शहराचा विकास नको आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी स्पर्धेतून शहरास बाद केले आहे. प्रशासनावर विनाकारण ठपका ठेवला जात असून शिवसेना व भाजपा सरकार आयुक्तांसह प्रशासनासोबत असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे शहरवासीयांची फसवणूक झाली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी स्मार्ट सिटीसाठी अभिप्राय नोंदविणाऱ्या ४ लाख नागरिकांचा अपमान केला आहे. शहरवासीयांना स्मार्ट सिटी हवी आहे. ही संकल्पना आता घराघरामध्ये पोहचली आहे. सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यासाठी १८ डिसेंबरला नवी मुंबई बंदचे आयोजन केले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. किशोर पाटकर यांनी राष्ट्रवादीला स्मार्ट सिटीचा प्रस्ताव समजलाच नसल्याचा टोला मारला. यावेळी बेलापूर संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे, नगरसेवक नामदेव भगत, शिवराम पाटील, एम. के. मढवी, द्वारकानाथ भोईर, सरोज पाटील, मनोज हळदणकर, सोमनाथ वास्कर, रामचंद्र घरत, संपत शेवाळे, दीपक पवार, काशिनाथ पवार, कमलताई पाटील, विनया मढवी, मेघाली राऊत, प्रशांत पाटील, सुमित्र कडू, समीर बागवान, बबनदादा पाटील, महेश कोठीवाले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. >>> शहरवासीयांना हवी स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीसाठी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईला देशात तिसरा व राज्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले. देशातील ९८ शहरांच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळविण्यासाठी पालिका प्रशासनासह नागरिकांनीही कंबर कसली होती. चार महिन्यांत ३ लाख ८७ हजार नागरिकांनी स्मार्ट सिटी कशी असावी याविषयी लेखी सूचना पाठविल्या होत्या. शाळेतील मुलांनीही चित्रकला स्पर्धेपासून वॉकेथॉनपर्यंत सहभाग घेतला होता. राष्ट्रवादीने प्रस्ताव फेटाळल्यामुळे शहरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून देशात पहिला क्रमांक मिळविण्याची संधी हुकवल्याची खंत व्यक्त केली आहे. एनएमएमसीला मिळालेली संधी स्मार्ट सिटी म्हणून स्वीकारून चांगल्या पद्धतीने या शहराचा विकास करता येईल. विकास म्हणजे केवळ ड्रेनेज, रस्ते नव्हेत याच्याही पुढे भविष्यातील नवी मुंबईच्या गरजा लक्षात घेऊन रचनात्मक कामातून हे साध्य करता येईल आणि स्मार्ट सिटी या परियोजनेतून ते साकारही करता येईल.- संजय पालकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सानपाडा
शिवसेना - भाजपा आक्रमक
By admin | Updated: December 11, 2015 01:34 IST