पनवेल : तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे टपाल खात्यातील व्यवहारांतही वाढ झाली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी टपाल खात्याला परिसरात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. टपाल खात्यांतर्गत पत्र, तार, मनीआॅर्डर, मनी ट्रान्सफर, स्पीड पोस्ट आदी मुख्य सेवा पुरवल्या जातात. यात तार सेवा आता बाद झाली असली तरी मनीआॅर्डर- मनी ट्रान्सफर, स्पीड पोस्ट सेवेला आजही नागरिकांकडून विश्वासाने पसंती दिली जात आहे. याशिवाय शासकीय पत्रव्यवहार, पार्सल, महत्त्वाची कागदपत्रे, बिले, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, परमिट, पासपोर्ट, बँकांच्या नोटिसा किंवा माहितीपत्र, न्यायालयाच्या नोटिसा, समज, निकालपत्र हे आजही पोस्टानेच पाठवले जातात. नवीन पनवेल येथे मुख्य पोस्ट कार्यालय असून त्या अखत्यारीत खांदा वसाहत, कामोठे, पनवेल ही पोस्ट कार्यालये येतात. या चारही कार्यालयांतर्गत मोठा परिसर येत असून जवळपास साडेतीन लाखांची लोकवस्ती आहे. या पट्ट्यात एलआयसी, राष्ट्रीयकृत बँका, शासकीय कार्यालयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे येथे पत्रांची आवक - जावक जास्त असते त्याचबरोबर इतर अनेक कामांचा ताणही अधिक असतो. कार्यालयीन काम संगणकीकृत झाले असले तरी पत्र वाटपाची भिस्त पोस्टमनवरच असते. या चार कार्यालयात मिळून फक्त ३0 पोस्टमन कार्यरत असून एका एकावर पाच ते सहा सेक्टरची जबाबदारी देण्यात आली असून आजही बहुतांश पोस्टमन सायकलचाच वापर करतात किंवा पायी फिरतात. आजारपण, सुट्या यामुळे प्रलंबित कामांचा भार वाढत जातो. या कारणाने वेळेत टपाल देणे अनेकदा अशक्य होते. या परिसराला किमान ३८ पोस्टमनची आवश्यकता असल्याचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
पनवेलमध्ये पोस्टमनची कमतरता
By admin | Updated: September 30, 2015 00:16 IST